
महिला सक्षम होणे अत्यावश्यक : रूपाली चाकणकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण खूप कमी आहे. या भूमीला थोर व्यक्तींचा वारसा लाभलेला आहे. वैचारिक जडणघडणीमुळे मातृशक्तीचा सन्मान करायचा हा तुमचा विचार आहे.तो तुम्ही प्रत्यक्षात अमलात आणता म्हणून या भागात बालविवाह प्रकार कमी आहेत, स्त्रीभ्रूण हत्येच्या घटना होत नाहीत, म्हणून हा जिल्हा महिलांसाठी अतिशय सुरक्षित आहे.
मातृशक्तीची सुरक्षितता हा जिल्हा जोपासतो याबाबत मला अभिमान वाटतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी वेंगुर्ले येथे बोलताना केले.वेंगुर्ले कॅम्प येथे बॅ. नाथ पै समुदाय केंद्र येथे महिला आयोग दारी या कार्यक्रमांतर्गत आयोजित महिला मार्गदर्शन आढावा बैठकीत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर महिलांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.