
घाटकोपर जॉली जिमखाना येथे झालेल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत आकांक्षा कदम विजेती.
घाटकोपर जॉली जिमखाना येथे नुकत्याच झालेल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत रत्नागिरीच्या आकांक्षा उदय कदम हिने विजेतेपद पटकावले. महिलांच्या अंतिम सामन्यात आकांक्षाने मुंबईच्या मिताली पाठकला २५-१९, १२-१२, २५-१३ असे पराभूत केले. आकांक्षाचे हे कारकिर्दीतील ११ वे राज्यस्तरावरील महिला विजेतेपद ठरले.अंतिम सामन्यात प्रवेश करण्यापूर्वी आकांक्षाने मुंबईच्या रिंकी कुमारीवर २४-१४, २५-१४ अशी मात केली होती. विजेत्यांना घाटकोपर जॉली जिमखान्याचे मानद सचिव मुकेश बदानी व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरूण केदार यांच्या हस्ते रोख पारितोषिक व चषक देवून गौरविण्यात आले.
या प्रसंगी राज्य कॅरम संघटनेचे खजिनदार अजित सावंत, मुंबई-उपनगर जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष चव्हाण तसेच घाटकोपर जॉली जिमखान्याचे खजिनदार बलवंत संगरकर व मिकीन सेठ, ट्रस्टी मारिश गांधी व नीलकंठ मेहता उपस्थित होते. स्पर्धेतील विजयाबद्दल आकांक्षाचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.www.konkantoday.com