विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मिऱ्या वासियांचे बेमुदत साखळी उपोषण.
मिर्या गावात विकास कामे करताना अत्यंत दर्जाहीन पध्दतीची केली जात असल्याचा ग्रामस्थांचा आक्षेप असू कामांबाबत ग्रामपंचायतीलाही विचारात घेतले जात नाही. ग्रामस्थांच्या जागा-जमिनींमधून न विचारताच ही कामे सुरु असल्यामुळे आणि संबंधित यंत्रणा व प्रशासन लक्ष देत नसल्याने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मिर्या गावचे सरपंच, उपसरपंचांसह सदस्य आणि ग्रामस्थांनी विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
पंधरा ऑगस्ट पूर्वीच विविध कामांविषयी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. परंतु कोणत्याही कामामध्ये सुधारणा झाली नाही. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जलजीवन मिशन अंतर्गत जाकीमिर्या व भाटीमिर्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीचे काम सुरु आहे. महावितरणसाठी भूमिगत केबल टाकणे व स्ट्रीटलाईटचे काम सुरु आहे. मिर्या नागपूर हायवेचे काम दर्जाहीन पध्दतीचे झाले आहे.
पावसाळ्यामध्ये महावितरणच्या भूमिगत केबलमुळे स्ट्रीटलाईटच्या खांबांना शॉक लागून दोन जनावरे दगावल्याची घटना घडली होती. या समस्येसह भारती शिपयार्डच्या जागी सुरु असलेल्या योमेन कंपनीकडून स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांचे पत्र देण्यात आले होते.जिल्हा प्रशासनाकडून महावितरण, जिल्हा परिषदेसह संबंधित विभागांना याची माहिती देण्यात आली होती. परंतु, त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये पुन्हा आठवण म्हणून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. परंतु त्यानंतरही या कामांमध्ये सुधारणा झाली नाही.
अखेर ग्रामपंचायतीच्यावतीने बेमुदत साखळी उपोषणाचा इशारा देण्यात आला होता.सोमवारपासून मिर्याच्या सरपंच सरपंच आकांक्षा कीर, उपसरपंच उषा कांबळे, सदस्य आदिती भाटकर, स्मिता शिरधनकर, मानसी शिरधनकर, आर्या सावंत, रामदास बनप, आदेश भाटकर, गुरुप्रसाद माने, विजेंद्र कीर यांच्या ग्रामस्थ व माजी सरपंच बावा नार्वेकर, संदीप शिरधनकर, भैय्या भाटकर यांनी साखळी उपोषणात सहभाग घेतला.