
एका दिवसात तब्बल ९ लाख ९९ हजार ३५९ मतांची वाढ झाली कशी? काँग्रेसने थेट निवडणूक आयोगालाच…!
. नागपूर : विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत महाघोटाळा झाल्याचे दिसत असल्याने जनभावना अत्यंत तीव्र झाल्या आहेत. मतांमधील ७.८३ टक्के वाढीवर अनेक स्तरातून शंका उपस्थित केल्या जात आहेत.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेली मतांची आकडेवारी पाहता मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजल्यानंतर मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागायला हव्या होत्या. त्यानुसार, राज्यातील किती मतदारसंघांत संध्याकाळी ५ नंतर मतदारांच्या लांब रांगा लागल्या होत्या? याचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे निवडणूक आयोगाने जाहीर करावेत, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पाठवले आहे.मुख्य निवडणूक अधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात नाना पटोले पुढे म्हणतात की, निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार २० नोव्हेबर रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंत ६५.२ टक्के मतदान झाले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे २१ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता जाहीर केलेली अधिकृत आकडेवारी ६६.०५ टक्के होती.
निवडणूक आयोगाने स्वत: अधिकृतरित्या जाहीर केलेल्या आकडेवारीत १.०३ टक्के ची तफावत कुठून आली? एका दिवसात तब्बल ९ लाख ९९ हजार ३५९ मतांची वाढ कशी झाली? मतांच्या टक्केवारीतील तफावत पाहता हा प्रकार चिंताजनक वाटत आहे. मतांच्या या वाढीबद्दल जनतेच्या मनात शंका उपस्थित होत असतील तर त्या दूर करणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. निवडणूक आयोगाने स्वतः पुढे येऊन आपली भूमिका पुराव्यासह स्पष्ट करावी आणि जनतेच्या मनातील शंकांचे समाधानकारक उत्तर द्यावे, असे या पत्रात नमूद केले आहे.या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून सर्वाधिक फटका काँग्रेस पक्षाला बसला.
काँग्रेसने १०१ जागांवर उमेदवार दिले होते मात्र त्यांच्या केवळ १६ जागा निवडून आल्या आहेत. ७.८३ टक्के मते वाढल्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यानंतर आता निवडणूक आयोगाने नाना पटोलेंच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे.निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदान झाले, त्याच रात्री ११.३० वाजता ते ६५.०२ टक्के तर दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर रोजी हेच मतदान ६६.०५ टक्के झाल्याचे सांगितले. यात एकूण ७.८३ टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. तब्बल ७६ लाख मतांची ही वाढ असून मतदानाचा टक्का कसा वाढला? निवडणूक आयोगाने जिथे मतदान वाढले त्या केंद्राचे व्हिडीओ जाहीर करावे. निवडणूक आयोगाने जनतेच्या मतांवर दरोडा टाकला आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.