
रत्नागिरी शहरातील विविध योजनांसाठी खोदलेल्या चराची जबाबदारी कोणाची? नागरिकांना नाहक त्रास
रत्नागिरी शहरात गेल्या काही महिन्यात विविध योजनांसाठी रस्त्याच्या बाजूने चर खणण्यात आले आहेत. शहरात विविध भागात नळ पाणी योजना,गॅस पाईपलाईन, रिलायन्स केबलसाठी मोठ्या प्रमाणावर खोदाई करण्यात आली आहे. मात्र ही खोदाई करून चर काढल्यानंतर पाईपलाईन टाकल्यानंतर हे चर योग्य रितीने लेव्हल करून डांबरीकरणाने बुजविणे आवश्यक होते. ही पाईपलाईन नेण्यासाठी सदरच्या कंपन्या नगर परिषदेकडे लाखोंनी रुपये यापोटी भरत असतात. नगरपरिषद देखील ही खोदाई झाल्यानंतर कंपन्यांना काही अटी घालत असतात. मात्र असे असूनही हे काम पूर्ण झाल्यानंतर खोदाई केलेल्या ठिकाणी रस्ता पुर्ववत केला जात नाही. असाच ऐक प्रकार सध्या थिबा पॅलेस रोड हिंदू कॉलनी येथे झाला आहे. या ठिकाणी चर खोदण्यात आला व त्याच्यावर बुजविण्यासाठी माती ढकलण्यात आली. आता पावसाच्या एका सरीतच ही माती आजुबाजूच्या गटारात गेल्याने या भागातील गटारे तुंबली आहेत. याशिवाय चरावरील मातीच्या ढिगार्यामुळे या भागातून चालणेही नागरिकांना कठीण होवून बसले आहे. सामान्य नागरिक नगरपरिषदेचा टॅक्स भरत असतो. मात्र तरीदेखील अशा कारभारामुळे त्यांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. याबाबत नगरपरिषद प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे, अशी नागरिकांची मागणी आहे.
www.konkantoday.com