
राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत धुसफूस कायम,माजी मंत्री भास्कर जाधव नाराज?
चिपळूण ः लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीला राज्यात अपेक्षित यश मिळालं नाही. या अपयशातून सावरून दोन्ही पक्ष आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. मात्र येथेही कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. कोकणात राष्ट्रवादीला चांगलं यश मिळाले. रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार आणि पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी विजय मिळविला. तरीही कोकणात राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत धुसफूस कायम आहे. राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव हे नाराज असल्याने ते मुंबईतील बैठकीला गेले नसल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार यांनी मुंबईतील राष्ट्रवादी कॉंग्रेस भवनात बैठकांचे सत्र सुरू ठेवले आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय ते आढावा घेत आहेत. यासाठी स्थानिक आमदार किंवा तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष तसेच महत्वाचे नेते उपस्थित रहात आहेत. विधानसभेसाठी राष्ट्रवादीने जोरदार तयारी सुरू केली असताना कोकणात मात्र पक्षांतर्गत धुसफूस या बैठकांच्या निमित्ताने समोर आली आहे. मुंबईत झालेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि दोनवेळा मंत्री राहिलेले आ. भास्कर जाधव हे अनुपस्थित राहिले. त्यामुळे भास्कर जाधव यांच्या नाराजीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.