
कोकणातील शेतकर्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे -आ.भास्कर जाधव.
कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. शेती बुडाली आहे. शेतकरी संकटात आहे. त्यामुळे शेतकर्यांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी माजी मंत्री, आमदार भास्करशेठ जाधव यांनी मुख्यमंत्री, अर्थमंत्री, कृषि मंत्री आणि मुख्य सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. संपूर्ण कोकण किनार पट्टीमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून बिगर मोसमी पाऊस कोसळत आहे. कोकणात साधारणपणे २३ मेपासून भात व नांगलीची कामे सुरू होतात, जूनच्या पहिल्या आठवड्यात मोसमी हंगाम सुरू होतो. या पावसावर भात व नागलीची रोपे तयार होऊन पाऊस स्थिरावल्यानंतर लावणीची कामे सुरू होतात, परंतु १५ मेपासूनच कमी-जास्त प्रमाणात सुरू झालेल्या पावसाने १९ मेपासून मुसळधार रूप घेतले आहे. नदी, नाले पूरसदृश स्थितीत भरून वाहत आहेत. शेती पाण्याने भरली आहे. पेरणीपूर्वीची करावी लागणारी मशागतीची कामेदेखिल अपूर्ण आहेत. अशावेळी पाण्याने भरलेल्या शेतात मशागत आणि पेरणी करायची कशी, असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. पेरणी करण्याच्या प्रयत्न झाल्यास भात वाहूनच जाणार, हे निश्चित आहे. त्यामुळे यावर्षी भात, तसेच नागलीची पिके घेता येतील की नाही, या चिंतेत इथला शेतकरी आहे.www.konkantoday.com