अवकाळी पावसाने पर्यटन व्यवसायाचे प्रचंड नुकसान :जिल्हा हॉटेल्स संघटनेचे सचिव सुनील देसाई.

रत्नागिरी : कोकणात १५ मेपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून, पर्यटन व्यवसायाची सारी गणिते अवकाळी पावसामुळे पार धुवून गेली आहेत.. मे महिन्याच्या मध्यान्हातच अवकाळी पाऊस सुरू झाल्याने पर्यटकांचा विरस झाला. अनेकांनी आपले फिरण्याचे नियोजन रद्द केल्याने याचा परिणाम सर्वच पर्यटन व्यावसायिकांवर झाला आहे. पर्यटन स्थळी पर्यटकांची संख्या रोडवली आहे. व्यवसायिकांना ग्राहकांची वाट पाहावी लागत असल्याने एकंदरीत अवकाळी पावसाचा फटका सर्व पर्यटन व्यवसायाला बसला आहे, अशी कैफियत रत्नागिरी जिल्हा हॉटेल्स संघटनेचे सचिव सुनील देसाई यांनी मांडली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या व्यावसायिकांची परिस्थिती लक्षात घेऊन मदतीचा हात द्यावा, अशी मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली आहे. कोकणात उन्हाळ्यात फिरायला येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप असते. आंबा हंगाम आणि कोकणातील समुद्र किनाऱ्यांचे आकर्षण यामुळे परीक्षा झाल्या की महाराष्ट्र भरातून पर्यटक कोकणात येत असतात. तसेच मुंबई-पुण्यात राहणारे कोकणवासियही आपल्या गावी येत असतात. त्यामुळे महिना दोन महिने कोकण गर्दीने गजबजलेले असते. या दरम्यान मोठी आर्थिक उलाढाल होते. पर्यटन व्यवसायिक, हॉटेल व्यवसायिक, वाहन व्यावसायिक यांच्यामध्ये समाधान असते. साधारण संपूर्ण मे महिना ही उलाढाल चालू असते. उन्हाळी सुट्टीत होणाऱ्या मोठ्या आर्थिक उलाढालीवरच पावसातील २ महिन्याचे खर्च भागत असतात; पण या वर्षी मात्र अवकाळी पावसामुळे ही सारी गणिते बिघडली आहेत. १५ मे पासून कोकणात अवकाळी पाऊस सुरू झाल्याने पर्यटकांचा विरस झाला असून, अनेकांनी आपले फिरण्याचे नियोजन रद्द केले आहे.

या सर्वांचा परिणाम पर्यटन व्यवसाय आणि त्याच्याशी निगडीत इतर व्यवसायांवर झाला आहे. कर्ज काढून, भाडे तत्वावर हॉटेल चालवणाऱ्या व्यवसायिकांची अवस्था तर फार बिकट झाली आहे. पावसाळा हंगाम काढायचा कसा, हा मोठा प्रश्न या व्यावसायिकांसमोर समोर उभा राहिला आहे. व्यावसायिक शासनाकडे मदतीच्या अपेक्षेने पाहत आहेत. गेले वर्षभर मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे हैराण झालेल्या हॉटेल्स, पर्यटन, वाहन व्यावसायिक यांना आता अवकाळी पावसामुळे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. या व्यावसायिकांना राज्य शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी या याकडे गांभीर्याने लक्ष घालून व्यावसायिकांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा हॉटेल्स संघटनेचे सचिव सुनील देसाई यांनी या पत्राद्वारे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button