
सीएनजीच्या तुटवड्याबाबत संयुक्त बैठक घेऊन लवकरच तोडगा काढू – खा.सुनिल तटकरे.
रत्नागिरी जिल्हा पर्यटनाच्या नकाशावर येत आहे. जिल्ह्यातील शहरे विकसित होत असल्यामुळे पर्यटकांचा ओढा वाढत चालला आहे. खाजगी वाहनांद्वारे जिल्ह्यात पर्यटक येतात. सीएनजी इंधनावरील वाहनांची संख्या वाढत आहे. परंतु रत्नागिरी जिल्ह्यात सीएनजी पंपांची संख्या कमी असल्याने पंपांच्या बाहेर वाहनांच्या प्रचंड मोठ्या रांगा दिसतात. त्यामुळे पर्यटकांचा वेळ वाया जातो. यासाठी असलेल्या पंपांमध्ये पुरेसा इंधन साठा व पेट्रोल पंपांमध्ये अतिरिक्त सीएनजी सेंटर सुरू करण्याच्या पेट्रोलियम कंपन्या व महानगर गॅस यांची संयुक्त बैठक घेऊन यावर तात्काळ तोडगा काढून निर्णय घेतला जाईल अशी माहिती रत्नागिरी-रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर जिल्हा शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव उपस्थित होते. यावेळी बोलताना खा.तटकरे यांनी जिल्हा नियोजन समितीत मांडलेल्या विषयांची माहिती दिली. जिल्ह्यात बीएसएनएलच्या फोर जी नेटवर्कचा खेळ खंडोबा सुरू आहे. नेटवर्क वाढवण्यासाठी केंद्र सरकारने ५५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून आवश्यक टॉवर महसुली गावनिहाय उभारण्याची तरतूद आहे. परंतु बीएसएनएलकडून त्याची अंमलबजावणी झालेली नाही. प्रांत व बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून टॉवरच्या जागा निश्चित कराव्यात. ज्या ठिकाणी टॉवर उभे आहेत त्यांना महावितरणने तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश खा.तटकरे यांनी दिले.
जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानकांचे सुशोभिकरण झाले. परंतु पायाभूत सुविधा अद्यापही अपुर्या आहेत. या सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देण्यासाठी कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक, पालकमंत्री, स्थानिक आमदार यांच्यासमवेत रेल्वे स्थानकांची संयुक्त पाहणी करून त्यामध्ये सुधारणा केली जाईल. रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही खा.तटकरे यांनी सांगितले.जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयात असलेल्या रुग्णवाहिका नादुरुस्त आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी रुग्णालयाकडे निधी असल्यामुळे रुग्णवाहिका नादुरुस्त अवस्थेत वापरल्या जातात. त्यामुळे रुग्णांच्या जिविताला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे रुग्णवाहिकांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांना स्वतंत्र निधी देण्याची मागणी खा. तटकरे यांनी केली आहे.राज्य शासनाची १०८ रुग्णवाहिकेची सेवा तालुक्यापुर्ती मार्यादित आहे.
मंडणगड, दापोली अशा तालुक्याातील अत्यवस्थ रुग्णांना मुंबई, पुणे येथे उपचाराला घेवून जाण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांची मान्यता घ्यावी लागते. त्यामध्ये बराच वेळ जातो. त्याचा परिणाम रुग्णाच्या उपचारावर होत आहे. त्यामुळे संबधित वैद्यकिय अधिकार्यांनी सुचना दिल्यानंतर तत्काळ जिल्ह्याबाहेर जाण्याची मान्यता देण्याची सुचना खा.तटकरे यांनी केली.तर कंपन्यांच्या सीएसआर फंडातून रुग्णालयांना आवश्यक मशीन आपण देणार असल्याचे खा. तटकरे म्हणाले.जलजीवन मिशनच्या अंमलबजावणीसाठी नेमण्यात आलेल्या कंपनीने कार्यालयात बसून आराखडा तयार केला. त्यामुळे योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत अडथळा येत आहे. तर दुसरीकडे एकाच ठेकेदाराकडे २० गावांची कामे देण्यात आली आहे. त्यामुळे कामांना विलंब होत आहे. तर काही ठिकाणी कामे पुर्ण झालेली नसताना बिले काढण्यात आली आहेत.
या सर्वप्रकाराची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी आपण पाणी पुरवठा मंत्र्यांकडे करणार असल्याचे खा. तटकरे यांनी सांगितले.तर योजनेत भ्रष्टाचार करणार्या ठेकेदार, अधिकार्यांवर फौजदारी कारवाई करण्याची सुचना खा. तटकरे यांनी केली आहे.पाच कोटींपेक्षा जास्त रकक्मच्या योजनांची अंमलबजावणी जिवन प्राधिकरण मार्फत सुरु आहे. त्यांच्याबद्दलही अनेक तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या आहेत. दापोली, मंडणगड, खेड तालुक्यातील कामांचा आढावा आपण घेतला आहे. अर्धवट स्थितीत असलेली कामे तात्काळ सुरु करण्याचे आदेश आपण दिल्याचे खा. तटकरे यांनी सांगितले.