
मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनर हातावरून गेल्याने महिला जखमी.
मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण शहरातील विंध्यवासिनी परिसरात रविवारी दुपारी १२ वा. कंटेनर हातावरून गेल्याने महिलेचा हात निकामी झाला. अपघातानंतर पळून जाणार्या कंटेनर चालकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र हा अपघात महामार्गाच्या कामासाठी बॅरिगेटस थेट रस्त्यावर लावल्याने अपघात झाल्याचा आरोप होत आहे.शमिम सुलतान सनगे (कान्हे-मोहल्ला) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. सनगे या आपल्या दुचाकीवरून २ मुलांसह शहराकडे येत होत्या. त्यांची दुचाकी रविवारी दुपारी १२ वा. वरील ठिकाणी आली असता ती चिखल व खड्ड्यांमुळे घसरली. त्यामुळे त्या रस्त्याच्या उजव्या तर दोन्ही लहान मुले डाव्या बाजूला पडली. एवढ्यात मागून महमद फरिद खान (३८, उत्तरप्रदेश) हा कंटेनर घेवून आला. मात्र बॅरिगेटसमुळे जागाच नसल्याने त्याला तो बाजूला घेता आला नाही. त्यामुळे सनगेंच्या हातावरून चाक गेल्याने त्यांचा हात निकामी झाला. यानंतर खानने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र काही नागरिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला काही अंतरावर पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. जखमी सनगेंना प्रथम खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यानंतर त्यांना मिरज येथे हलविण्यात आले.www.konkantoday.com