राज्यातील सहा जिल्हा रुग्णालयांमध्ये कर्करोगावरील उपचार उपलब्ध होणार! जालना, रत्नागिरी, बारामती व धाराशीव येथे रेडिएशन ऑनकॉलॉजी केंद्र.

मुंबई : कर्करोग रुग्णांना अधिकाधिक चांगले आणि त्यांच्याच परिसरात उपचार मिळावेत यासाठी राज्यातील सहा जिल्हा रुग्णालयांमध्ये कर्करोगावरील उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार चार जिल्हा रुग्णालयांमध्ये रेडिएशन ऑनकॉलॉजी केंद्र तर दोन जिल्ह्यांमधील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये रेडियोथेरेपी आणि डे केअर किमोथेरेपी केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून उभारण्यात येणाऱ्या या केंद्रांमुळे सहा जिल्ह्यातील रुग्णांना त्यांच्या घराजवळ उपचार मिळू शकतील. त्यामुळे मुंबई, पुणे यांसारख्या शहरातील रुग्णालयांवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होईल.नागरिकांना घराजवळ कर्करोगावरील उपचार सुविधा मिळावी यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीकोनातून राज्यातील जिल्हा रुग्णालयांमध्ये कर्करोगावरील उपचार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्हा रुग्णालये कर्करोगावर उपचार करण्यास सक्षम झाल्यास रुग्णांना मुंबई, पुणे यांसारख्या शहरात उपचारासाठी जाण्याची गरज पडणार नाही. त्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील चार जिल्हा रुग्णालयांमध्ये रेडिएशन ऑनकॉलॉजी केंद्र तर दोन जिल्ह्यांमध्ये रेडियोथेरेपी आणि डे केअर किमोथेरेपी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेडिएशन ऑनकॉलॉजी केंद्र हे जालना, रत्नागिरी, बारामती व धाराशीव येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये सुरू करण्यात येणार आहे, तर अमरावती व नाशिक येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये रेडियोथेरेपी आणि डे केअर किमोथेरेपी केंद्र उभारण्यात येणार आहे. रेडिएशन ऑनकॉलॉजी केंद्र, रेडियोथेरेपी आणि डे केअर किमोथेरेपी केंद्र हे टर्न की तत्त्वावर उभारण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button