कोकण आणि कोल्हापूर विभागीय मंडळाचा शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी

बोर्ड परीक्षेचा राजमार्ग': सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे उपक्रम नियोजन, गुणवत्ता आणि नैतिकतेचा अनोखा संगम

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी कोकण आणि कोल्हापूर विभागीय मंडळाने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि दूरदृष्टीचा उपक्रम सुरू केला आहे. 'बोर्ड परीक्षेचा राजमार्ग: सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे' या नावाने सुरू झालेला हा प्रकल्प केवळ एक मार्गदर्शक पुस्तिका नसून, दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या वर्षभराच्या प्रशासकीय व शैक्षणिक कामकाजाचे महिनानिहाय, सूत्रबद्ध नियोजन देणारी एक समग्र कार्यप्रणाली आहे.

परीक्षा म्हटले की घेणारे व देणारे या दोघांसाठी ताणतणावाचा विषय. यातून परीक्षार्थी व आयोजक या दोघांचेही मूल्यमापन होते. विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम कार्यान्वित झाला आहे. त्यांनी स्वतः सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये शाळा प्रमुखांच्या बैठका घेऊन या नियोजनाचे महत्त्व पटवून दिले, ज्यामुळे मंडळाच्या नेतृत्वाने थेट शाळा प्रमुखांशी संवाद साधून प्रशासकीय बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण समोर ठेवले आहे.

या उपक्रमाची उद्दिष्ट्ये केवळ परीक्षा आयोजित करण्यापुरती मर्यादित नाहीत, तर ती प्रशासकीय शिस्त, शैक्षणिक गुणवत्ता आणि नैतिक संस्कार या तीन स्तंभांवर आधारित आहेत. मंडळाच्या नेहमीच्या ‘परीक्षक’ भूमिकेऐवजी ‘मार्गदर्शक, समन्वयक आणि नैतिक प्रेरणास्रोत’ अशी सक्रिय भूमिका घेऊन प्रशासकीय उच्च मानके प्रस्थापित केली आहेत. विशेषतः कोकण व कोल्हापूर मंडळाने मागील अनेक वर्षे निकालात अनुक्रमे प्रथम व द्वितीय स्थान टिकवून ठेवले आहे, तसेच मागील वर्षी कोल्हापूर विभागात एकही कॉपी प्रकार आढळला नाही, तर कोकणात केवळ एक प्रकार वगळता कॉपीमुक्त परीक्षा आयोजित करण्यात यश मिळवले आहे.

पुस्तिकेचे अभिनव तत्त्वज्ञान: भावनिक आणि मानसशास्त्रीय जोड
या नियोजन पुस्तिकेची सर्वात मोठी ताकद तिच्या प्रेरणादायी आणि भावनिक रचनेत दडलेली आहे.

यश-प्रतीक मुखपृष्ठ: पुस्तिकेच्या मुखपृष्ठावर बोर्डाचे प्रमाणपत्र दाखवून जल्लोष करणाऱ्या विद्यार्थ्यांचे छायाचित्र समाविष्ट आहे. हा केवळ अंतिम टप्पा नसून, तो प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक आणि प्रशासनासाठी एक दृश्यात्मक उद्दिष्ट आहे. हे स्फुल्लिंग चेतवणारे यश-प्रतीक मिळवण्यासाठी सर्व संबंधितांना उत्कृष्ट कार्य करण्याची प्रेरणा देते.

‘नियोजन म्हणजे यशाची वाट’ कविता: अंतर्भागात समाविष्ट असलेली ही गेय कविता, सूत्रबद्ध नियोजनाचे महत्त्व अत्यंत सहज आणि सकारात्मक भाषेत पटवून देते. ती विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण न वाटू देता, तो एक नियोजित प्रवास आहे, हे समजावून सांगते.

त्रिवेणी नियोजन प्रणाली आणि कार्यात्मक वैशिष्ट्ये:
या पुस्तिकेचे वैशिष्ट्य म्हणजे यात प्रशासकीय काम, शैक्षणिक कार्य आणि विशेष उपक्रम या तीन स्तंभांचे एकाच ठिकाणी महिनानिहाय संकलन केले आहे. यामुळे कामांचे योग्य विभाजन होते आणि ऐनवेळी होणारी धावपळ टळते.

प्रमुख उद्दिष्ट्ये आणि वैशिष्ट्ये:
परीक्षा कामकाजात सुसूत्रता: ऑनलाईन अर्ज भरणे, प्रि-लिस्ट तपासणी, शिक्षक पॅनेल सादर करणे यांसारख्या सर्व प्रशासकीय प्रक्रिया अचूकपणे आणि वेळेत पूर्ण करण्याची सक्ती.

शैक्षणिक गुणवत्तेत वाढ: नियमित अध्यापनासोबतच घटक चाचण्या, सत्र परीक्षांचे विश्लेषण आणि महत्त्वाचे म्हणजे मागे पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपचारात्मक अध्यापनावर भर.

नैतिक मूल्य रुजवणूक (कॉपीमुक्ती): ‘कॉपीमुक्ती’ला केवळ प्रशासकीय नियम न ठेवता, ती प्रामाणिकपणाचे मूल्य रुजवणारी एक सकारात्मक सामाजिक चळवळ बनवणे. यासाठी सप्टेंबरमध्ये ‘कॉपीमुक्त परीक्षा शपथ’ आणि जानेवारीमध्ये ग्रामसभेत जनजागृती यांसारखे उपक्रम अनिवार्य केले आहेत.

मानसिक आरोग्याला प्राधान्य: विशिष्ट महिन्यांमध्ये ताणतणाव व्यवस्थापन शिबिरे अनिवार्य करणे, ‘हसत मुखाने परीक्षा मोहीम’ आणि मोबाईलचा मर्यादित वापर यावर भर देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवणे.

सर्वांगीण विकासाचा समतोल: अभ्यासक्रमाव्यतिरिक्त करिअर मार्गदर्शन, आहार व आरोग्य शिबिरे आयोजित करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे.

सततचा पाठपुरावा: विभागीय मंडळाकडून दरमहा पाठपुरावा बैठका घेऊन अंमलबजावणीत सातत्य राखणे आणि जबाबदारी निश्चित करण्याची यंत्रणा तयार करणे.

यशाचे अंतिम सूत्र: कृती महत्त्वाची
या उपक्रमाची अंमलबजावणी दोन सत्रांमध्ये (दिवाळीपूर्वी आणि दिवाळीनंतर) स्पष्टपणे विभागली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कालमर्यादा निश्चित केली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना डिसेंबर-जानेवारीमध्ये सराव प्रश्नपत्रिका, पूर्व परीक्षा आणि उजळणीसाठी पुरेसा वेळ मिळेल.

कोकण विभागीय मंडळाच्या सचिव पुनिता गुरव यांनी परिपत्रकात शाळांना नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कळवले आहे. विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, हा आराखडा उत्कृष्ट असला तरी त्याचे यश केवळ कागदावर अवलंबून नसून, तो योग्य वेळेत, योग्य पद्धतीने आणि संपूर्ण निष्ठेने अमलात आणण्यावर अवलंबून आहे.

विभागीय मंडळाचा हा ‘बोर्ड परीक्षेचा राजमार्ग’ उपक्रम महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात प्रशासकीय, शैक्षणिक आणि नैतिक असा अनोखा संगम साधणारा ठरणारा आहे. हा उपक्रम राज्यातील इतर शिक्षण मंडळांसाठी एक आदर्श व मार्गदर्शक प्रारूप ठरू शकतो. विभागीय मंडळाने सिद्ध केले आहे की, कठोर परिश्रम आणि शिस्तबद्ध नियोजनातून शिक्षणाचा मार्ग ‘यशाकडे नेणारा, नैतिक मूल्याधिष्ठित आणि आत्मविश्वासपूर्ण महामार्ग’ बनू शकतो. आता शाळा व कनिष्ठ महाविद्यालये या नियोजनाची कशी अंमलबजावणी करतात, यावर महाराष्ट्राच्या शैक्षणिक प्रगतीला नवा आयाम मिळेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button