
टीएचआर पाकिटबंद आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह.
अंगणवाडीमार्फत गरोदर माता व बालकांना दिला जाणारा पोषण आहार त्याच्या दर्जामुळे नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. आताही गरोदर माता व बालकांना दिल्या जाणार्या टीएचआर पाकिटबंद आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चविष्ट नाही म्हणून गरोदर माता व बालकही तो आहार घेत नाहीत, घेतला तरी तो खात नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या पाकिटबंद आहाराचे करायचे काय, या विवंचनेत अंगणवाडीताई आहेत.महिला बालकल्याण विभागामार्फत अंगणवाडीच्या माध्यमातून तीन प्रकारच्या व्यक्तींसाठी आहार दिला जातो. त्यामध्ये गरोदर माता, स्तनदा माता, 6 महिने ते 3 वर्षे बालक आणि 3 वर्षे ते 5 वर्षे बालक यांचा समावेश आहे. 3 ते 5 वर्षे बालकांना अंगणवाडीत आहार शिजवून दिला जात आहे. यामध्ये हरभरा, खिचडी, वाटाणा, इडली, मसाले भात असे पदार्थ बनवून खाऊ घातले जातात. तर गरोदर माता, स्तनदा माता आणि 6 महिने ते 3 वर्षे बालकांना पाकिटबंद आहार दिला जात आहे. पूर्वी पाकिटबंद आहाराऐवजी तांदूळ, डाळ, हरभरा, गहू असा कोरडा आहार दिला जात होता. पण, चार महिन्यांपासून पूर्वी दिला जाणार कोरडा आहार बंद करण्यात आला असून, तो आता पाकिटबंद तयार देण्यात येत आहे.पाण्यात टाकून तो शिजवून खायचा आहे. मात्र, या पाकिटबंद आहाराबाबत तक्रारी असून, ही पाकिटे नेण्यास गरोदर व स्तनदा माता उत्सुक नाहीत.