बाळासाहेबांचे शिवसैनिक, माजी आमदार अप्पांना विनम्र आदरांजली- बाळ माने
रत्नागिरी* : तत्वनिष्ठ राजकारणी, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आणि भाजप-सेना युतीच्या सत्तेमधील राजापूरमधील आमदार विजय तथा अप्पा साळवी हे सर्वांनाच सुपरिचित होते. अलीकडच्या व्यावहारिक राजकारणावर ते आसूड ओढायचे. थेट व भेदक बोलणारे अप्पा राजकारणातले अनेकांचे गुरू आहेत, अशा शब्दांत रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांनी अप्पांना आदरांजली वाहिली.अप्पा साळवी यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्याविषयी बाळ माने यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बाळासाहेबांच्या सुरवातीच्या काळातील मोजक्या सैनिकांमध्ये अप्पांचा समावेश होता. भाजप व शिवसेना यांच्या युतीच्या कालावधीत १९९५ मध्ये अप्पा राजापूरमधून विजयी झाले. जुनी शिवसेना रत्नागिरी जिल्ह्यात रुजवणारे अप्पा संपूर्ण जिल्ह्यात सुपरिचित आहेत. त्यांनी आमदारकीच्या काळात अनेक विकासकामे केली. आजही अप्पांना मानणारा वर्ग आहे. आम्हीसुद्धा अप्पांकडून अनेक गोष्टी शिकलो. पक्षनिष्ठा कशी असावी याचा धडा त्यांच्याकडून सर्वांना घ्यावा, अशी अपेक्षा बाळ माने यांनी व्यक्त केली.भाजपाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे अप्पा सासरे असून अप्पांचे सुपुत्र बाळू साळवी व सूनबाई हेसुद्धा राजकारण, समाजकारणात सक्रिय आहेत. साळवी कुटुंबियांच्या दुःखात आम्ही माने परिवार सहभागी आहोत. अप्पांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून येणार नाही, या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर देवो, अशी प्रार्थना बाळ माने यांनी व्यक्त केली.