ऐन झोपेत असताना खवळलेल्या समुद्राचे पाणी नौकेत शिरले…नौका उलटली अन् तीन खलाशी बुडाले… गुजरातच्या रत्नसागर नौकेवर काळाचा घाला

रत्नागिरी : मच्छीमारी नौकेला भगदाड पडून आत पाणी घुसल्याने नौका उलटून झालेल्या अपघातात तीन खलाशी बुडाले तर चौघांचा जीव वाचवण्यात यश आले. ही नौका गुजरातमधील तलासरी येथील असून तिचे नाव ‘रत्नसागर’ असे आहे. बुडालेल्या तिघांपैकी दोघांचे मृतदेह हाती लागले असून एकजण अद्याप बेपत्ता आहे. ही दुर्घटना रत्नागिरीपासून 95 वाव समुद्रात घडली. तटरक्षक दलाच्या पथकाने बचावलेल्या चौघांसह तलासरी येथील तीनही नौका व दोन मृतदेह घेऊन दुपारी 3 वा. मिरकरवाडा बंदर गाठले. त्यानंतर मृतदेह व बचावलेल्या चौघांनाही रत्नागिरी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. एका खलाशाचा तटरक्षक दलाकडून शोध सुरू ठेवण्यात आला आहे. गुजरात तलासरी येथील रत्नसागर, गदाधर, कुणकेश्वरी 2, कपीध्वज या चार नौका 95 वाव समुद्रात मासेमारी करीत होत्या. रत्नागिरीपासून खोल समुद्रातील वातावरण खवळलेले असल्याने, या नौकांनी नांगर टाकला होता. यातील रत्नसागर नौकेतील खलाशीही रात्री 8 वाजल्यानंतर समुद्र शांत होण्याची वाट पाहत बसले होते. मध्यरात्री लाटांच्या मार्‍यामुळे नौकेच्या मध्यभागातील फळीचा एक खिळा निखळल्याने भगदाड पडून पाणी आत घुसले. खलाशांना काही समजण्यापूर्वीच नौका कलंडू लागली. त्यावेळी नौकेच्या डेकवर बसलेल्या खलाशांनी ओरडून केबीनमधील तांडेल व अन्य खलाशांना जागे करण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्वजण नौकेच्या बाहेर पडण्यापूर्वीच नौका पाण्यात उलटी झाली. यावेळी डेकवरील कल्पेश लहाने भंडार (30, तलासरी), दीपक भिखार वळवी (38, तलासरी), अंतोल देवल्या भगत (32, ) , जयवंत जंत्र्या खरपडे (50, तलासरी), हे पाण्यात फेकले गेले. ते नौकेवरील दोर पकडून काही काळ पाण्यात लटकत राहिले. त्यानंतर उलट्या झालेल्या नौकेवर चढून आपला जीव वाचवला. यावेळी त्यांनी जवळच असलेल्या नौकांना ओरडून बचावासाठी प्रयत्न केला. अपघातग्रस्त नौकेपासून जवळ असणार्‍या गदाधर या नौकेतील खलाशांनी या बुडालेल्या नौकेवरील चौघांनाही आपल्या नौकेवर घेतले. हा प्रकार पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडला. यानंतर गदाधर नौकेवरील खलाशांनी अपघाताची माहिती आपल्या मालकांना दिली. त्यानंतर अपघाताची घटना तटरक्षक दलाच्या मुंबईतील नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर रत्नागिरीला कळवण्यात आले. बुधवारी सकाळी हेलिकॉप्टरही मदतीसाठी व शोध घेण्यासाठी रवाना झाले. रत्नसागर नौकेमधील लक्ष्मण भिखार वळवी (वय 42) व सुरेश भिखार वळवी (वय 45) दोघेही रा. तलासरी या दोघ्या सख्ख्या भावांचे मृतदेह सकाळी दिसून आल्यावर अन्य नौकांमधील खलाशांनी त्यांना बाहेर काढले. यातील मधुकर चैत्या खटल (वय 45) तलासरी हा खलाशी बेपत्ता आहे. घटना घडली त्यावेळी मधुकर हा केबीनच्या खाली असणार्‍या जागेमध्ये झोपला होता. त्यामुळे त्याला बाहेर पडता आले नसावे, अशी शक्यता बचावलेल्या खलाशांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button