रत्नागिरी कर्‍हाडे ब्राह्मण संघाचे पुरस्कार जाहीर

रत्नागिरी कर्‍हाडे ब्राह्मण सहकारी संघाने या वर्षीचे विविध पुरस्कार आज घोषित केले. दर्पण पुरस्कार पत्रकार सौ. ज्योती मुळ्ये (रत्नागिरी), आचार्य नारळकर पुरस्कार सूर्यकांत घाटे (ओणी), उद्योजक पुरस्कार निशिकांत तथा नंदू तांबे (शिरवली), आदर्श किर्तनकार पुरस्कार हभप दत्तात्रय उपाध्ये (वालावल), धन्वंतरी पुरस्कार डॉ. अनिल पत्की (लांजा) आणि आदर्श पौरोहित्य पुरस्कार वे. मू. गणेश साळस्कर (देवरुख) यांना जाहीर झाला.
संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष मिलिंद आठल्ये आणि सचिव शिल्पा पळसुलेदेसाई यांनी पुरस्कारांची घोषणा केली. पुरस्कार वितरण सोहळा 22 डिसेंबरला दुपारी 3 वाजता कर्‍हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून कुडाळ येथील प्रसिद्ध वैद्य आणि गतवर्षीचे धन्वंतरी पुरस्कार विजेते सुविनय दामले उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार वितरणानंतर वैद्य दामले ‘खरे आरोग्य कुठे शोधावे?’ या विषयावर उद्बोधक व्याख्यान देणार आहेत.
मुक्त पत्रकार सौ. ज्योती मुळ्ये या 1999 पासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांनी सांस्कृतिक, साहित्यिक प्रतिनिधी म्हणून वृत्तसंपादन, ललित लेखन केले आहे. तसेच आकाशवाणी, मासिके, वृत्तपत्रांसाठी सदर लेखन केले आहे. सध्या मुक्त पत्रकार असून सोशल मीडियासाठी कॉपी रायटिंग, डॉक्युमेंटरीसाठी लेखन, पुस्तकांसाठी शब्दांकन, संपादन, भाषांतर करतात. आचार्य नारळकर पुरस्कार विजेते घाटे हे चुना कोळवण कर्लेवाडी शाळेत शिक्षक आहेत. ते 32 वर्षे प्राथमिक शिक्षक आहेत. देवरुख मोगरवणे या एकशिक्षकी व अतिदुर्गम शाळेत सेवेला सुरवात केली. दीड तास डोंगरदरी पार करून 11 वर्षे नोकरी करताना गावचा विकासही केला. शैक्षणिक कामाबाबत अत्युत्कृष्ट म्हणून गोपनीय अहवालातनोंद करण्यात आली.
उद्योजक पुरस्कार प्राप्त तांबे यांनी शिरवली येथे 2010 पासून पूर्वीची असलेल्या झाडांचे संवर्धन करून नवीन लागवड केली. त्यांच्या 40 एकर जंगलात 232 पेक्षा जास्त पक्षी आढळतात. तसेच 40 प्रकारचे साप, फुलपाखरे, कोळ्यांच्या विविध जाती, बिबट्या, खवले मांजर, साळींदर, भेकर, चौशिंगा, पिसोर आदी 30 प्राण्यांचेही अस्तित्व आहे. आदर्श किर्तनकार पुरस्कारप्राप्त हभप उपाध्ये हे वालावल गावचे. श्रीपादबुवा ढोले यांच्याकडे कीर्तनाचे शिक्षण सुरू असून 350 हून अधिक कीर्तने महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरातमध्ये केली आहेत. धन्वंतरी पुरस्कार प्राप्त डॉ. पत्की हे लांज्यात 1976 पासून वैद्यकीय सेवा देत असून 1988 प्रथम क्ष-किरण चिकित्सा विभाग, 1995 मध्ये ईसीजी क्लिनिक, लॅबरोटरी सुरू केली. महिलाश्रमाचे विश्‍वस्त म्हणून काम करतात व वडिलांच्या स्मरणार्थ ट्रस्ट स्थापन केला आहे. पौरोहित्य पुरस्कारप्राप्त साळस्कर हे कुवळे, भरणी गावचे. घराण्यात पूर्वीपासून परंपरागत पौरोहित्य. सातवीनंतर पुण्यात आबासाहेब पटवर्धन पाठशाळेत पं. नवाथे गुरुजींकडे 12 वर्षे अध्ययन केले. नंतर 10 वर्षे नगर येथे वेदांत विद्यापीठात, 10 वर्षे डेरवण, 4 वर्षे राजापूर वेदशाळेत अध्यापन केले. सध्या देवरुख येथे अध्यापन करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button