
देशात 5 दिवस पासपोर्ट सेवा राहणार बंद, नेमकं कारण काय? नवीन पासपोर्ट किती दिवसांनी मिळणार?
देशभरातील पासपोर्ट सेवा 5 दिवसांसाठी बंद राहणार आहे. पासपोर्ट विभागाने एक ॲडव्हायजरी जारी करुन याबाबतची माहिती दिली आहे. तांत्रिक देखभालीमुळं पासपोर्ट सेवा पोर्टल आजपासून म्हणजे 29 ऑगस्ट रात्री 8 वाजल्यापासून ते 2 सप्टेंबरच्या सकाळपर्यंत बंद राहणार असल्याचे विभागाने म्हटले आहे. या कालावधीत पासपोर्ट केंद्रांवर कोणत्याही नवीन अपॉइंटमेंट्स शेड्यूल केल्या जाणार नाहीत. तसेच आधी बुक केलेल्या अपॉइंटमेंट्स पुन्हा शेड्यूल केल्या जाणार आहेत.*दरम्यान, एखाद्याला जर नवीन पासपोर्टकाढायचा असेल तर आता तुम्हाला 15 दिवस वाट पाहावी लागणार आहे. त्याचवेळी, जर तुम्ही आधीच नवीन पासपोर्टसाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला त्यासाठी 30 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान तारीख मिळाली असेल, तर ती देखील रद्द केली जाईल आणि वाढवली जाईल. या पाच दिवसांमध्ये नागरिकांसाठी आणि सर्व MEA/RPO/BOI/ISP/DOP/पोलीस अधिकाऱ्यांसाठी ही प्रणाली उपलब्ध नसेल, असं पासपोर्ट विभागाने ॲडव्हायझरीमध्ये म्हटले आहे.
पाच दिवस विभागाचे कोणतेही काम होणार नाही. सेवा बंद झाल्याचा परिणाम पासपोर्ट सेवा केंद्र तसेच स्थानिक पासपोर्ट कार्यालय आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात दिसून येईल. तीन प्रकारचे पासपोर्ट आहेत. यामध्ये पहिला ब्लूकव्हर पासपोर्ट, दुसरा मरुन कव्हर पासपोर्ट आणि तिसरा ग्रेकव्हर पासपोर्ट आहे. ब्लूकव्हर पासपोर्ट हा एक सामान्य पासपोर्ट आहे. हा पासपोर्ट कोणत्याही भारतीय नागरिकाला दिला जातो. मरुन कव्हर पासपोर्ट हा डिप्लोमॅटिक पासपोर्ट आहे. हा पासपोर्ट अधिकृत मुत्सद्दी आणि सरकारी पदे असलेल्या सदस्यांसाठी भारत सरकारद्वारे जारी केले जाते. ग्रेकव्हर पासपोर्ट हा अधिकृत पासपोर्ट आहे. हा पासपोर्ट परदेशात काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना आणि अधिकृत असाइनमेंटवर सरकारने खास अधिकृत केलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीला दिला जातो दरम्यान, आधीच्या अर्जानंतर 30 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत अपॉइंटमेंट मिळाल्यास ती दुसऱ्या तारखेला बदलावी लागणार आहे. अशा तऱ्हेने केवळ दिल्लीच नव्हे तर देशभरातील अर्जदारांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या कालावधीत लोकांना नवीन अर्ज करता येणार नाहीत.