
नेपाळमध्ये एक बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत महाराष्ट्रातील काही भाविकांचा मृत्यू
महाराष्ट्रातील पर्यटकांच्या बसला नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यात अपघात झाला आहे. नेपाळमधील काठमांडुमध्ये निघालेल्या बसमध्ये एकूण 40 ते 41 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. हे सर्व प्रवासी महाराष्ट्रातील असल्याची माहिती समोर आली आहे.त्यापैकी 14 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 16 ते 17 प्रवासी गंभीर जखमी असल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. नेपाळमध्ये एक बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत महाराष्ट्रातील काही भाविकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमींना लवकर आराम पडावा, अशी प्रार्थना करतो, असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच, जळगावमधून संबंधित अधिकारी नेपाळला जाणार असून मृतांचे पार्थिव मूळगावी आणण्यात येणार असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय.