
दापोली नगर पंचायतीला द्वितीय क्रमांकाचा ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’
नवी दिल्ली विज्ञान भवन येथे तिसऱ्या ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ वितरण समारंभाचे आयोजन केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून करण्यात आले होते. जल व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी सुर्डी ग्राम पंचायत सोलापूर, दापोली नगरपंचायत रत्नागिरीसह ग्रामविकास संस्था, औरंगाबाद या अशासकीय संस्थेला मंगळवारी ‘राष्ट्रीय जल पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल, बिश्वेश्वर टुडू आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी ११ श्रेणीत ५७ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रपती यांच्या हस्ते देशपातळी प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या राज्य संस्थेला पुरस्कार प्रदान करण्यात आले. उर्वरित पुरस्कार केंद्रीय जलशक्ती मंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप मानचिन्ह, प्रशस्ती पत्र आणि रोख रक्कम असे आहे.
उत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था श्रेणीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगर पंचायतीला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार नगराध्यक्षा ममता मोरे, नगर पंचायतीचे पाणी पुरवठा अधिकारी स्वप्निल महाकाळ यांनी स्वीकारला. दापोली येथील नारगोली धरण पुनरूज्जीवन मोहीम यशस्वी करून येथील नगरपंचायतीने लोकसहभागातून पाणी टंचाईवर मात केली. त्याचबरोबर धरणाचेही मजबुतीकरण, खोलीकरण केले. त्यामुळे पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. याचा परिणाम असा झाला की, नगर पंचायतही टँकरमुक्त झाली आहे, अशी प्रतिक्रिया ममता मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.