सहा जिल्ह्यातील ६० हजार खटल्याचा निकाल होण्याकरीता कोल्हापुरात सर्कीट बेंच तातडीने होणे गरजेचे-रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे

देशात ५.१ कोटी प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. त्याचा निपटारा होण्याकरीता ३३४ वर्ष लागतील, असा निती आयोगाचा अहवाल आहे. अशा परिस्थितीत सहा जिल्ह्यातील ६० हजार खटल्याचा निकाल होण्याकरीता कोल्हापुरात सर्कीट बेंच तातडीने होणे गरजेचे आहे. या लढा सामान्य पक्षकांराठी आहे. सर्व लोकप्रतिनिधींना भेटून सर्किटबेंचसाठी आग्रह धरला पाहिजे, असे प्रतिपादन रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनीयांनी केले. मुंबई उच्च न्यायालय, कोल्हापूर खंडपीठ कृती समिती आयोजित वकिल परिषद कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये शनिवारी झाली. त्यावेळी ते बोलत होते.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई हे कोल्हापूर खंडपीठ याकरिता सकारात्मक आहेत, अशी माहिती ॲड. संग्राम देसाई यांनी या परिषदेत दिली. सर्कीटबेंच हा सहा जिल्ह्यातील वकिलांचा जिव्हाळ्याचा विषय असल्याने मुख्यमंत्री यांनी लक्ष घालून उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांची एकत्र बैठक आयोजित करावी अशी विनंती निमंत्रक ॲड. सर्जेराव खोत यांनी केली.परिषदेमध्ये पाठपुरावा करिता ॲड. सर्जेराव खोत, ॲड. संग्राम देसाई आणि ॲड. विलास पाटणे यांची समिती नेमण्यात आली आहे. याप्रसंगी सर्व वकिलांना प्रतिज्ञा देण्यात आली. परिषदेच्या अध्यक्षस्थानी ॲड. वसंतराव भोसले होते. परिषदेत निमंत्रक ॲड. सर्जेराव खोत, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सिंधुदुर्गमधील सदस्य ॲड. संग्राम देसाई, कोल्हापूरमधील सदस्य ॲड. विवेक घाटगे, ॲड. विकास पाटील, माजी निमंत्रक ॲड. शिवाजीराव राणे, सिंधुदुर्ग बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. विवेक माडगुळकर, रत्नागिरीतून ॲड. अशोक कदम, ॲड. प्रदीप नेने, ॲड. अनिरुद्ध फणसेकर, रत्नागिरी बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष ॲड. शाल्मली आंबुलकर आदी उपस्थित होते. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी सोलापूर या सहा जिल्ह्यातून १५००वकील हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button