कोकणातून मुंबईकडे येणारी रेल्वेगाडी सीएसएमटीऐवजी ठाण्यापर्यंत धावणार, ३० एप्रिलपर्यंत प्रवाशांचे हाल!

मुंबई : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असून त्यामुळे कोकणातून मुंबईकडे येणारी रेल्वेगाडी सीएसएमटीऐवजी ठाण्यापर्यंत धावणार आहे. मंगळुरु ते मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस ठाण्यापर्यंत चालवून अंशत: रद्द केली जाईल. तसेच कोकणातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जनशताब्दी, तेजस एक्स्प्रेस सीएसएमटी ऐवजी दादर पर्यंत धावणार आहे. तिन्ही रेल्वेगाड्यांचे अशाप्रकारचे वेळापत्रक ३० एप्रिलपर्यंत असेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाट क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणाच्या कामांनी वेग धरला आहे. त्यामुळे या फलाटावर येणाऱ्या रेल्वेगाड्या इतर फलाटावर पाठवण्यात येतात. तसेच, काही रेल्वेगाड्या फलाटाच्या अभावामुळे त्यांचा सीएसएमटी थांबा रद्द केला आहे. यामध्ये कोकणातील तीन रेल्वेगाड्या आहेत. परंतु, सीएसएमटी थांबा रद्द केल्याने प्रवाशांचे आर्थिक नुकसान होत आहे. तेजस, जनशताब्दी यांसारख्या महत्त्वाच्या रेल्वेगाड्या सीएसएमटीऐवजी दादरपर्यंत धावत आहेत. मंगळुरू एक्स्प्रेस सीएसएमटी ऐवजी ठाण्यापर्यंत धावते. परिणामी, प्रवाशांना ठाण्यावरून सीएसएमटी गाठण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतोय.ठाणे स्थानकात प्रवासी सामानासह उतरून, पुन्हा ते सामान घेऊन लोकलने किंवा पर्यायी वाहनाने मुंबईत घेऊन जावे लागते.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे फलाट विस्तारीकरणाचे काम सुरू आहे.

फलाट क्रमांक १० आणि ११ चे विस्तारीकरण झाले असून १२, १३ या फलाटांचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर या फलाटावरून २४ डब्यांची रेल्वेगाडी धावू शकेल. परंतु, सध्या सुरू असलेल्या पायाभूत कामांमुळे गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरु ते मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस ठाण्यापर्यंत चालवून अंशत: रद्द केली जाईल.गाडी क्रमांक २२१२० मडगाव ते सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १२०५२ मडगाव ते सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस दादरपर्यंत चालवून अंशत: रद्द केली जाईल. अशा पद्धतीचे वेळापत्रक ३० एप्रिलपर्यंत चालवण्यात येईल, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button