दापोली कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा मानसिक व शारीरिक छळ होण्याचा प्रकार
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी
विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालय दापोली येथे चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याचा त्याच्याच वर्गातील ३ विद्यार्थ्यानी शारिरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार या विद्यार्थ्याने या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता यांचेकडे केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कृषी महाविद्यालय दापोलीच्या चतुर्थ वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी यांना कृषी शिक्षणाचे प्रत्यक्ष शिक्षण शेतात घेता यावे यासाठी त्यांना साडेचार महिने कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील गावांमधील शेतकरी यांचेकडे पाठवले जाते. विविध गावात राहून हे विद्यार्थी शेतीचे धडे घेत असतात तसेच शेतकऱ्याना विद्यापीठाने केलेल्या संशोधनाची माहिती देतात. अशाच ११ विद्यार्थी यांचा एक गट रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एका गावात कार्यरत होता. त्यातील एका विद्यार्थाला याच गटातील अन्य ३ सहकारी विद्यार्थी त्रास देत होते. मात्र या विद्यार्थ्याच्या वडिलांना हृदयविकाराचा त्रास होत असल्याने त्याने या त्रासाबाबत त्यांना माहिती दिली नाही. त्याच्या या ३ सहकारी मित्रांनी या गावात प्रशिक्षण घेण्यासाठी गेल्यावर तीसऱ्या दिवसापासून या मुलाला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामध्ये अन्य सहकारी मित्र यांचेसमोर अंतर्वस्त्रावर नाचायला लावून त्याचा व्हिडीओ तयार करणे, रात्री उंट होण्यास सांगून चादर अंगावर टाकून मारहाण करणे, दारू पाजून गुप्तांगाला दोरी बांधून त्रास देवू अशीही त्याला धमकी देण्यात आली असे या विद्यार्थ्याने कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता यांचेकडे केलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीची चौकशी करण्यासाठी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती त्यात सदस्य म्हणून डॉ. आनंद मयेकर (रावे कार्यक्रम प्रमुख), डॉ. जीवन आरेकर (कार्यक्रम अधिकारी), आर. एस. गुजर (सहाय्यक कुलसचिव) यांचा समावेश आहे. या समितीने सर्व ११ विद्यार्थी यांचेकडून माहिती घेतली व मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे या विद्यार्थ्याला त्रास देणाऱ्या ३ विद्यार्थ्याना अन्यन पाठवण्यात आले असल्याची माहिती कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी यांनी दिली. या प्रकरणी सखोल चौकशी
करण्यात येणार असल्याचेही डॉ. जोशी यांनी सांगितले.



