
मिरजोळी ग्रामपंचायतीला प्रांताधिकऱ्यांची नोटीस
_गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावर उक्ताड येथे पावसाळ्यात पाणी साचण्याचे नवीन ठिकाण तयार झाले आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी मिरजोळी ग्रामपंचायतला येथील प्रांताधिकऱ्यांनी नोटीस काढली आहे.गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूने मिरजोळी गाव वसलेले आहे. चिपळूण शहराला लागून असलेला आणि मिरजोळी गावाच्या हद्दीतील उक्ताडचा परिसर झपाट्याने विकसित झाला आहे. या ठिकाणी उंच इमारती उभ्या आहेत तसेच व्यावसायिक गाळे आणि पक्की दुकाने तयार झाली आहेत. येथूनच उक्ताड बायपास काढण्यात आला आहे. तो पुढे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला मिळतो. हा भाग पूर्वी पुरापासून सुरक्षित मानला जात होता. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात इमारती उभ्या राहिल्या. खाडीपट्टा आणि गुहागरमधील दुर्गमभागात राहणारे लोक येथे शिक्षण आणि वैद्यकीय कारणासाठी सदनिका घेऊन राहू लागली. येथे इमारती आणि दुकानांसाठी गाळे बांधताना चक्क गटार बुजवून बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा नाही.