
मंडणगडातील अनेक घाटात सुरक्षा कठडे नसल्याने वाहनचालक असुरक्षित.
मंडणगड तालुक्यातील केळवत, शेनाळे, माहू, नारगोली, तुळशी, उमरोली, चिंचघर, घोसाळे, कुडूक, सावरी, निगडी, भामघर चौकी, घुमरी गावातील घाटांमध्ये धोकादायक वळणांवर संरक्षक भिंती नसल्याने घाट मार्गाने प्रवास करणार्या वाहनांची वाहतूक सुरक्षा अनेक वर्षापासून रामभरोसे आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पंचायत समिती बांधकाम विभाग, पंतप्रधान ग्रामसडक योजना कार्यालय यांनी समस्येकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष केले आहे.
चिंचाळी धरणानजिक दाभोळ-मुंबई एसटी बसला झालेल्या अपघाताने हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.गाडी दरीत कोसळली ते शेनाळे घाटातील ठिकाणी अपघातासाठी कुप्रसिद्ध आहे. काही वर्षापूर्वी क्रिकेट सामने खेळण्यासाठी जाणार्या मुलांचा डंपरही याच ठिकाणाहून दरीत कोसळला होता. त्यानंतर एक खासगी गाडी खाली गेली होती. आता एसटी बसचा हा तिसरा अपघात आहे. यामुळे घाटांमध्ये पन्नासहून अधिक ठिकाणी तातडीने नव्याने संरक्षक भिंती उभारणे गरजेचे बनले आहे.www.konkantoday.com