
कुवारबावमध्ये उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर, जागरूक रहिवाशांकडून समाधान व्यक्त
रत्नागिरी, प्रतिनिधी : कुवारबाव ग्रामपंचायतीचा घनकचरा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाने स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री उदय सामंत यांनी स्टरलाइट प्रकल्पाच्या जागेत रत्नागिरी शहरासह परिसरातील ग्रामपंचायत साठी पाच एकर जागेत घनकचरा प्रकल्प उभारण्याची घोषणा केली असतानाच आता कुवारबाव ग्रामपंचायतने उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांना चाप लावण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची कारवाई केली आहे. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांना आता आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत असून कॅमेऱ्यात कैद होणाऱ्या वर कायदेशीर दंडात्मक कारवाई बरोबरच फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे. तसे फलक कुवारबाव, साईनगर, रवींद्र नगर या भागात लावण्यात आले आहेत.विशेषतः पत्रकार कॉलनी जवळील नाल्यात आणि पत्रकार कॉलनी जवळून सुयोग सोसायटीकडे पाण्याच्या टाकी जवळून जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला आजूबाजूच्या अपार्टमेंटमधील परिसरातील रहिवासी, व्यापारी, दुकानदार मोठ्या प्रमाणात कचरा फेकून दुर्गंधी निर्माण करीत असतात. त्यामुळे या भागात हिवताप, डेंग्यू, यासारख्या साथीचे प्रमाण वाढत आहे. शिवाय टाकलेल्या कचऱ्याच्या ठिकाणी मोकाट गुरे आणि मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला आहे. शिवाय नाल्यात टाकलेल्या कचऱ्यामुळे तिथून वाहणाऱ्या ओढ्याचे पाणी खालील भागात असलेल्या विहिरी आणि तलावामध्ये जाऊन पिण्याच्या पाण्याचे साठे प्रदूषित होत आहेत. त्यामुळे गॅस्ट्रो सारख्या आजारांचे प्रमाणही वाढत आहे.या भागातील उत्कर्ष नगर पासूनचे स्वतःला उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित समजले जाणारे रहिवासी आपल्या चार चाकी आणि दुचाकी वाहनातून येता जाताना बेशिस्तपणे कचरा फेकत असतात. अशा सर्वच बेशिस्त नागरिकांना या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे शिस्त लागणार आहे. ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याबद्दल येथील जागृत रहिवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.