
१३ भारतीयांसह तेल वाहू जहाज बुडाले संगमेश्वर- कसबा गावचा रहिवासी सम्रान इब्राहिम सय्यद याचा समावेश
ओमानमधील एक तेलवाहू जहाज समुद्रात बुडाले असून त्यावर असणाऱ्या 13 भारतीय नागरिकांसह एकूण 16 जण बेपत्ता झाले आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मुळ कसबा गावचा रहिवासी सम्रान इब्राहिम सय्यद या युवकाचा समावेश आहे. सोमवारी सायंकाळी हे जहाज ओमानच्या खोल समुद्रात बुडाले असून तेव्हापासून बेपत्ता झालेल्यांचा शोध घेतला जात असून दोन दिवस उलटले तरी ते सापडलेले नाहीत.प्रेस्टींज फाल्कन असे या जहाजाचे नाव आहे. या तेलवाहू जहाजावर 16 लोक होते. त्यामध्ये 13 भारतीय असून 3 श्रीलंकेचे नागरिक आहेत. या 16 जणांमध्ये 3 जण क्रु मेंबर्स (जहाजावरील कर्मचारी) आहेत. जहाजावरील सर्वच्या सर्व म्हणजे 16 जण समुद्रात बेपत्ता झाले आहेत. सोमवारी सायंकाळी उशीरा हे जहाज बुडाले. त्यांचा सर्व माध्यमातून शोध सुरू आहे. या ऑईल शीपवर 16 जण होते. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मुळ कसबा गावचा रहिवासी सम्रान इब्राहिम सय्यद (40) हा देखील होता. तो पाण्यात बेपत्ता झाला आहे. कंपनीच्या माध्यमातून या अपघाताची खबर कसबा येथील सम्रानच्या कुटुंबियांना मंगळवारी मेसेजद्वारे देण्यात आली. त्यानंतर नातेवाईक मंडळी सातत्याने कंपनीच्या संपर्कात आहेत. मात्र अजूनही कोणीही सापडले नसल्याचे कंपनीकडून मेसेज करून कळण्यात आले आहे. शोध सुरू असल्याचे कळण्यात आले आहे. सम्रान हरहुन्नरी तरूण असून तो 2 महिन्यापूर्वीच गावी गेला होता. जहाजावर कामासाठी निघून गेल्यानंतर त्याचा सातत्याने नातेवाईकांशी संपर्क होता. जहाज बुडाल्याच्या वृत्ताने कसबा परिसरात अनेकांना धक्का बसला असून सम्रानच्या कुटुंबियांसह अनेक कसबावासीय ओमानमधील ज्या कंपनीचे हे जहाज आहे त्या कंपनीच्या व्यवस्थापनाशी सातत्याने संपर्क साधत आहेत.