
टिटवाळा येथून साई पालखीसोबत पायी चालत जाणाऱ्या तिघा साईभक्तांवर काळाची झडप
टिटवाळा येथून साई पालखीसोबत पायी चालत जाणाऱ्या तिघा साईभक्तांवर काळाने झडप घातली आहे. भरधाव कारच्या धडकेत तीन साईभक्तांचा मृत्यू झाला आहे.घोटी सिन्नरदरम्यान ही घटना घडली आहे. तिन्ही जण टिटवाळा मांडा कोळीवाडा परिसरातील रहिवासी होते. या अपघातात भावेश राम पाटील, रवींद्र उर्फ कवी सुरेश पाटील आणि साई राज भोईर या तिघांचा मृत्यू झाला आहे. रवींद्र आणि भावेश हे चुलत भाऊ आहेत. रवींद्र यांचे लग्न झालेले आहे. त्यांना दोन लहान मुली आहेत. रिक्षा चालवून रवींद्र कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. या अपघाताला १६ तासांहून अधिक कालावधी उलटून गेला तरी पोलिसांनी वाहकाला शोधलेलं नाही. तसेच कारवाई केली नाही,असा आरोप रवींद्र आणि भावेश यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. रवींद्र यांच्या कुटुंबीयांकडून वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.साई आश्रय सेवा मंडळातर्फे शिर्डी येथे पायी चालत पालखी नेली जाते. या पालखीत या परिसरातील सुमारे दीडशे जण सहभागी होतात. यंदा देखील शनिवारी 13 तारखेला हे पालखी टिटवाळ्याहून शिर्डीच्या दिशेने पायी निघाली. या पालखीसोबत रवींद्र पाटील ,भावेश पाटील, साईराज भोईर व सलमान खान हे चौघे होते.