विधान परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचीही मतं फुटल्याचा मंत्री उदय सामंत यांचा खळबळजनक दावा
उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे गटाचीही मतं फुटल्याचा खळबळजनक दावा केला आहे. विधान परिषद निवडणुकीत केवळ काँग्रेसचीच नाहीत तर ठाकरे गटाचीही मतं फुटली. मिलिंद नार्वेकरांच्या मागे अदृष्य हात होते, असा दावा सामंत यांनी केला आहे. ज्या आमदारांनी आम्हाला मदत केली, त्यांच्याबाबत लवकरच वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल, असंही सामंत म्हणाले.काँग्रेसच्या नेतृत्वावर काँग्रेसच्या आमदारांचा विश्वास नाही. उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांचा उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास नाही. शरद पवार गटाच्या आमदारांचा शरद पवार यांच्यावर विश्वास नाही. स्वत:हून 22 ते 23 आमदारांनी महायुतीला मतदान केलं. भाजपाचा आकडा 105 वरुन 118 वर गेला, शिंदे साहेबांचा आकडा पाचने वाढला. अजित पवारांचा आकडा चारने वाढला आहे. पहिल्याच फेरीत आठ उमेदवार निवडून आले, असा दावा सामंत यांनी केला. तसंच उद्धव ठाकरे गटाची मतं 16 होती. त्यांच्यामध्ये पाच मतं वाढली. ही अदृश्य ताकद कोण आहे, ज्यांनी नार्वेकर यांना सोळा वरुन 22 वर नेलं, असंही सामंत म्हणाले.संजय राऊत यांच्या आरोपांना उत्तर देताना उदय सामंत यांनी उगाच कोणालाही बदनाम करु नका, तुम्ही देखील तुमच्या आमदारांना हॉटेल्समध्ये ठेवलं होतं. आमच्यावर पैशाच्या उधळपट्टीचा आरोप करत असताना तुम्ही काय केलं? असा प्रश्न विचारत महायुतीचं सरकार राज्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.