प्रस्तावाच्या चक्रात कोणी अडकणार नाही शिवसेना- मनसे युतीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया


गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन पक्षांची युती होणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. मात्र, या दोन्ही पक्षांचे प्रमुख परदेश दौऱ्यावर गेल्यामुळे ही चर्चा थांबली होती.आता हे दोन्ही नेते मुंबईत परतले असून पुन्हा एकदा युतीच्या चर्चेने जोर धरला आहे.

यावर आता खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, राज ठाकरेंनी मांडलेल्या युतीच्या भूमिकेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. प्रस्तावाच्या चक्रात कोणी अडकणार नाही. मनसेने देखील यापूर्वी युती करण्यापूर्वी कोणाला प्रस्ताव दिल्याचे निदर्शनास आलेले नाही. त्यामुळे शिवसेना व मनसे युती प्रस्तावाचा खेळ होणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

शिवसेना (ठाकरे) आणि मनसे एकत्र येण्याच्या पडद्यामागे हालचाली सुरू आहेत. अशात बुधवारी शिवसेना (ठाकरे) नेते, आमदार अनिल परब यांनी मनसेला टाळी देण्यास सकारात्मक असल्याचे जाहीर केले. मनसेने त्यावर शिवसेनेने योग्य तो प्रस्ताव पाठवावा, आम्ही देखील युतीसाठी सकारात्मक आहोत, अशी प्रतिक्रिया दिली.

यासंदर्भात पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, राज यांच्या पक्षाने एक भूमिका मांडली कुठल्याही प्रकारची नकारात्मक भूमिका न घेता महाराष्ट्र, मराठी माणूस आणि मुंबईच्या हितासाठी त्याकडे सकारात्मकतेने पाहत आहोत. दोन्ही बंधूंकडून चर्चा होईल. माध्यमांना याबाबत योग्यवेळी कल्पना दिली जाईल, असं संजय राऊत यांनी म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button