ज्येष्ठ गायक, व गुरू राजाभाऊ शेंबेकर यांचा आज रत्नागिरीत गौरव.

शास्त्रीय, उपशास्त्रीय, अभंग आणि नाट्यसंगीत या संगीताच्या क्षेत्रात आपली अवीट छाप सोडणारे, अनेक गायक-गायिकांना मार्गदर्शन म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ गायक, व गुरू राजाभाऊ शेंबेकर यांचा सन्मान सोहळा ५ मार्च रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत शहरातील माळनाका येथील मराठा मंडळ हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे.आपली गायकी स्वतःपुरती मर्यादित न ठेवता, मुक्त हस्ताने आपल्या शिष्यांना शिकवणारे आणि रसिकांना मंत्रमुग्ध करणारे राजाभाऊ, अतिशय निःस्पृह आणि निरपेक्षपणे संगीत सेवा करत असतात.

सुरेल गाण्याने त्यांनी रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. गायनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील संगीतप्रेमींवर एक अमूल्य संस्कार केला आहे.या अष्टपैलू व्यक्तीमत्वाला सन्मानपत्र आणि समयोचित पदवी बहाल करून तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

आपली गायकी स्वतःपुरती मर्यादित न ठेवता, मुक्त हस्ताने आपल्या शिष्यांना शिकवणारे राजाभाऊ

मैफिल संपल्यानंतर ‘धन्य त्या गायनी कळा ‘असा अनुभव तीच मैफिल अनेकदा ऐकल्यावर सुद्धा यावा अशी मैफिल म्हणजे राजाभाऊंच गाणं. नामदेवाच्या कीर्तनामध्ये जसा विठ्ठल समोर उभा ठाकत असे, तसे राजाभाऊ गाणं समोर उभे करतात.गाणं सादर करतानाच राजाभाऊ गाणं शिकवतात आणि म्हणून एकदाही  गाणं न शिकलेला रसिक, तबलजी आणि हार्मोनियम वादक राजाभाऊंचा शिष्य झालेला असतो. 

राजाभाऊ स्वतः एकलव्य आहेत परंतु अनेक एकलव्य त्यांनी तयार केले आहेत. कुठल्याही कलाकाराच्या जीवनात संधी, साधना, सिद्धी, प्रसिद्धी आणि संपत्ती या पाच गोष्टी वेळेवर मिळणे आवश्यक असते. राजाभाऊंना या सगळ्याच गोष्टी थोड्या उशिरा आणि खडतर होऊन मिळाल्या पण त्याची तमा न बाळगता राजाभाऊंनी आपली साधना अखंड सुरू ठेवली. एकाच गायकीची गुलामी न बाळगता अनेक गायकांची  गायकी राजाभाऊंच्या एकाच बैठकीत अनुभवायला  मिळते. राम मराठ्यांच्या ताना राजाभाऊंच्या नाट्यसंगीतात ऐकायला मिळतात तर छोटा गंधर्वांसारखा अभंगातून ते देव उभा करतात आणि तितक्याच तरलतेने ते अभिषेकींचं ‘कशी तुजं समजावू सांग’ समजावून सांगतात.  ‘ओठांचे फेड बंध, गाऊ गडे मुक्तछंद श्वासांचे करू प्रबंध, हृदयाचे मधू प्रयाग’ या ओळी ऐकताना मराठी कच्चे असलेल्या माणसाला  ही अर्थ सांगून जातात. गेली तीस वर्षेआम्ही राजाभाऊंच्या अनेक मेफिली ऐकल्या आहेत.  अगदी एसटी  मध्ये राजाभाऊ ड्रायव्हिंग सिटवर असतील  तर त्याच्या पाठीमागच्या आडव्या बाकावर बसून त्यांचा रियाज सुद्धा ऐकलाय. तरी अजूनही ते गाणं पहिल्या इतकंच ताजं वाटत राहतं. तीच तीच अनवट गाणी अनेक वेळा प्रेमापोटी राजाभाऊंनी आमच्यासाठी गायली आहेत परंतु अजूनही मन भरत नाही. राजाभाऊंच्या घरगुती मैफिलीत का होईना राजाभाऊंच्या काही गाण्यांना तबल्याची साथ करायला मिळाली.

अनेक साथीदारांना राजाभाऊंच गाणं भावात  पण पेलत नाही तरीही राजाभाऊ त्यांना प्रेमाने सांभाळून घेतात. राजाभाऊ बैठकीतल्या प्रत्येक रसिका साठी गातात मग त्याला गाणं समजत असो वा नसो. गाण्याइतकच त्यांचं लाघवी व्यक्तिमत्त्व आणि तितकंच दर्जेदार वक्तृत्व याचा  अनुभव  त्यांच्या भेटीतून आणि अलीकडच्या त्यांच्या मुलाखतीतून आपण घेतलाच आहे. एकाच वेळी उत्तम गुरु, अगदी जवळचा मित्र आणि दिलदार माणूस या तीन ही गोष्टी राजाभाऊंच्या  सहवासात आपल्याला मिळत असतात. लिहण्या सारखे बरेच आहे मात्र राजाभाऊंच्या गाण्याबद्दल एवढेच म्हणता येईल की, ‘जे जे उत्तम उदात्त उन्नत,  महन मधुर ते  ते’ म्हणजे राजाभाऊ चं गाणे. परमेश्वराच्या चरणी हीच प्रार्थना की, हा गान सूर्य असाच तळपत राहो!www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button