कोकण पदवीधर मतदारसंघात मतदारांची संख्या ४० टक्क्यांनी वाढली-जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह
कोकण पदवीधर मतदारसंघात मतदारांची संख्या ४० टक्क्यांनी वाढली आहे. मागील निवडणुकीवेळी १६ हजार २२२ मतदार होते. ती संख्या २२ हजार ६८१ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात ३८ मतदान केंद्रे असून, त्यावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू झाले असून, अजून दोनवेळा त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, कोकण मतदारसंघात ७ जुलैला मुदत संपणार असून त्याकरिता ३१ मे रोजी निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली. अर्ज भरणे, छाननी, मागे घेणे या प्रक्रियेनंतर २६ जूनला मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. १ जुलैला नेरूळ, नवी मुंबईतील आगरीकोळी संस्कृती भवन येथे मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त चोक्कलिंगम यांच्या सूचनेनुसार, ८०० मतदारांसाठी एक मतदान केंद्र नियुक्त केले आहे. त्यामुळे मतदारांची गर्दी न होता सुरळीत मतदान होईल. मतदारांना मतपत्रिका देण्यात येणार असून, त्यांना प्राधान्यक्रमाने मतदान करावयाचे आहे. रत्नागिरी जिल्ह्यात स्त्री मतदार ९ हजार २२८ आणि पुरुष मतदार १३ हजार ४५३ आहेत.मागीत निवडणुकीत २६ मतदान केंद्रे होती. आता ती ३८ करण्यात आली आहेतwww.konkantoday.com