
आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्रित मिळून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला-उद्धव ठाकरें
लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मविआच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत.खूप दबाव असताना सुद्धा महाराष्ट्रातील जनता आमच्या बाजुने उभी राहिली. लोकसभा निवडणुका पार पडल्यावर आता आम्ही विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आमची एक बैठक पार पडली आणि आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्रित मिळून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं मविआच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.मतदानाची टक्केवारी सांगत मतदारांनी भाजपला स्वीकारलं असल्याचं भाजपकडून सांगण्यात येत आहे. यावर उद्धव ठाकरेंनी म्हटलं, एकूण देशाची लोकसंख्या लक्षात घेतली तर 140 कोटी जनतेपैकी मतादानाचा अधिकार किती जणांना आहे आणि यापैकी भाजपला किती मतदान झाले तसेच मोदींच्या विरोधात किती मतदान झाले याची आकडेवारी समोर येईल. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वधर्मियांनी मतदान केलं आहे. यामध्ये मराठी बांधव तर आहेतच, हिंदू सुद्धा आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, शिख सुद्धा आहेत. मराठी माणसाने रक्त सांडवून मिळवलेली मुंबई जर त्यांच्या डोळ्यादेखत लुटली जात असेल तर अशा वेळी मराठी माणूस लुटणाऱ्याला मत देईल का? महाराष्ट्र आणि मुंबईतील मराठी माणूस मुंबई आणि महाराष्ट्राला लुटणाऱ्याला कदापी झोपेत सुद्धा मत देणार नाही. त्यामुळे भाजपला जर वास्तवाची जाणीव आली नसेल तर निवडणूक निकालाच्या विस्तवाला त्यांना सामोरे जावे लागेल असंही उद्धव ठाकरे म्हणाले.काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, निवडणुकीत मोठा भाऊ, लहान भाऊ काहीही चालणार नाही. प्रत्येक मतदारसंघात आम्ही बसून सर्वात चांगला उमेदवार कोणत्या पक्षात आहे हे जाणून निर्णय घेऊ. लवकरात लवकर जागावाटपाचा निर्णय घेऊ. पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना पुन्हा पक्षात घेणार का? या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेणार नाही. तर शरद पवार म्हणाले, पुन्हा पक्षात घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीwww.konkantoday.com