
रत्नागिरी जिल्ह्यातील ४१ साकव धोकादायक
*रत्नागिरी जिल्ह्यातील ४१ साकव धोकादायक* रत्नागिरी, : जिल्हा आणि तालुक्यांशी गाव, वाडीवस्ती जोडणाचे काम साकव करतात; परंतु जिल्ह्यातील ४१ साकव धोकादायक बनल्यामुळे ते वाहतुकीस बंद करण्याचा निर्णय जिल्हा परिषद बांधकाम विभागाने घेतला आहे. या साकवांच्या दुरुस्तीला ४ कोटी ७९ लाख खर्च अपेक्षित आहे. यामुळे अनेक वाडीवस्तींचा दळणवळणाच्यादृष्टीने संपर्क तुटणार आहे. ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. रत्नागिरी जिल्हा भौगोलिकदृष्ट्या दऱ्याखोऱ्याचा, कडेकपारीचा जिल्हा आहे. अनेक दुर्गम भागातील वाडीवस्त्यांना जोडण्यासाठी साकव बांधण्यात आले आहेत. मोठे वहाळ, नदीनाले, दऱ्यांवर ही साकव आहेत तसेच अनेक ठिकाणी मुलांना शाळा, कॉलेजला जाण्यासाठी, दळणवळणासाठी साकवांचा वापर होते. ग्रामीण भागात साकवांना मोठे महत्व आहे; परंतु जिल्हा परिषद बांधकाम विभागाने केलेल्या सर्व्हेमध्ये यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील ४१ साकव धोकादायक बनले आहेत. त्यामुळे वाहतुकीस हे साकव बंद करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.