रत्नागिरी शहरालगतच्या पांढर्‍या समुद्र किनारी भागात राजरोस पांढर्‍या वाळूचे उत्खनन


रत्नागिरी शहरालगतच्या पांढर्‍या समुद्र किनारी भागात राजरोस पांढर्‍या वाळूचे उत्खनन होत असल्याने येथील समुद्रकिनारा धोकादायक बनत चालला आहे. या ठिकाणाहून नियमित अनेक गाड्यांमधून वाळूची वाहतूक होत असून या वाळू उत्खननाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. प्रशासनाच्या डोळेझाकीमुळेच वाळू माफियांची या भागात दादागिरी सुरू असल्याचे दिसुन येत आहे. पांढर्‍या समुद्रकिनार्‍यावर वाळू माफियांनी महिला अधिकार्‍यावर हल्ला केल्याचे वृत्त जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना समजताच त्यांनी अधिकार्‍यांना याबाबत कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.
शहरातील मुरूगवाडा, पांढरा समुद्र किनारी भाग हा मिरकरवाडा प्राधिकरणाच्या जागेमध्ये येत असून या भागाकडे गेली अनेक वर्षे प्रशासनाकडून वाळू उत्खननाकडे दुर्लक्ष होत आहे. वाळू उत्खनन करणार्‍या व्यक्तींनी येथील किनारी भागातील वाळू खरवडून नेली आहे. याच भागात कस्टम विभागाची जेटी असून त्याच्यासमोरील भागातील वाळू काढल्याने मोठा खड्डा पडल्याचे दिसून येत आहे. याठिकाणी वाळूचे छोटे मोठे ढिगही तयार करण्यात आले आहेत. मुरूगवाडा भागातील किनार्‍यावर अनेक ठिकाणी वाळू भरलेली पोतीही दिसून येत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button