
रत्नागिरी शहर स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्याच्या कामाचा शुभारंभ स्मार्ट सिटीसाठी 594 कोटी पैकी 91 कोटी ग्रामीण भागासाठी-उद्योग मंत्री उदय सामंत
रत्नागिरी, दि. 7 (जिमाका) : तळोजाच्या धर्तीवर रत्नागिरीचा स्मार्ट सिटी म्हणून विकासित करण्यासाठी 594 कोटीचा निधी एमआयडीसीतून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापैकी 91 कोटी ग्रामीण भागासाठी खर्च करण्यात येणार आहेत. रत्नागिरीचा कायापालट करण्यासाठी 8 दिवसात डिपीआर तयार करण्यात आला आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितली.* येथील स्वा. वि.दा. सावरकर नाट्यगृहात रत्नागिरी शहर स्मार्ट म्हणून विकसित करण्याच्या कामाचा भूमिपुजन सोहळा तसेच महिलांना शिवणयंत्र वाटप कार्यक्रमाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रिमोटच्या सहाय्याने उपक्रमाबाबतची माहिती देणारी चित्रफित दाखवून या कार्यक्रमाचा शुभांरभ करण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवृत्त अभियंता नंदकुमार साळवी, एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता कालिदास भांडेकर, बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे, कार्यकारी अभियंता सचिन राक्षे, आबा घोसाळे, राहूल पंडीत, शिल्पा सुर्वे, बिपीन बंदरकर आदी उपस्थित होते. उद्योग मंत्री श्री. सामंत म्हणाले, रत्नागिरी स्मार्ट सिटी करताना शहरातील शाळा, तलाव, फुटपाथ विकसित करण्याबरोबरच ड्रेनेज सिस्टीम अधिक भक्कम करण्यावर भर दिला जाणार आहे. शहराच्या या विकासासाठी 594 कोटी देण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला आहे. यापूर्वी तळोजा शहराचा विकास स्मार्टसिटी म्हणून करण्यात आला असून, त्याचधर्तीवर हा निर्णय घेतला आहे. त्यानिधीपैकी 91 कोटी रुपये शहरालगतच्या ग्रामीण भागात देण्यात येणार असून, यातून अंगणवाडी, , प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, शाळा यांचा समावेश असणार आहे. महाराष्ट्रातील बस स्थानकांसाठी 500 कोटी एमआयडीसीच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. त्यामधून 193 बस स्थानके निर्माण करण्यात येत आहेत. यातील रत्नागिरीसाठी 27 कोटीचा निधी देण्यात आल्याचे सांगितले. उद्योजकांना जिल्ह्यात आणणारी एजन्सी म्हणून एमआयडीसी काम करत आहे. प्राणीसंग्रहालयही होत आहे, असे सांगून उद्योग मंत्री श्री. सामंत म्हणाले, आज उद्योगमंत्री झाल्यानंतर मतदार संघात 29 हजार कोटींचे दोन प्रदूषणविरहीत प्रकल्प आणले आहेत. स्टरलाईटची जागेवर सेमी कंडक्टरचा प्रकल्प होणार आहे. 10 हजार कोटी खर्चुन डिफेन्स क्लस्टर होत आहे. यामधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असून नोकरीसाठी जिल्ह्याबाहेर जाण्याची आवश्यकता नाही, असे ते म्हणाले.प्रातिनिधीक स्वरुपात महिलांना शिवण यंत्र आणि शाळांना डिजीटल फलक वाटण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आणि दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.