
शीळ धरण ते जॅकवेलपर्यंतच्या जलवाहिनीचे रखडलेले काम युद्धपातळीवर सुरू
रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणार्या शीळ धरण ते जॅकवेलपर्यंतच्या जलवाहिनीचे रखडलेले काम युद्धपातळीवर सुरू आहे. एकूण ५५० मीटरची ही जलवाहिनी असून आतापर्यंत ५५ मीटरचे काम पूर्ण झाले आहे. ते काम न.प. प्रशासनाकडून पूर्ण करून घेण्यासाठी शिवसेनेचे नगरसेेवक स्वतः लक्ष घालून पाठपुरावा करत आहेत.न.प. हद्दीत सध्या पाण्याची टंचाई सुरू आहे. शहरवासियांना शीळ धरणातील खालावलेल्या पाणीसाठ्यामुळे एकदिवस आड पाणीपुरवठा सुरू आहे. शीळ धरण ते पंपिंग हाऊसपर्यंत पाईपलाईन टाकण्यास झालेल्या विलंबाबाबत शहरवासियांकडून ओरड सुरू झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या जलवाहिनी जोडण्याच्या कामाची पाहणी शुक्रवारी शिवसेनेच्या शहरातील पदाधिकार्यांनी केली. नळपाणी योजना पूर्ण झाली असताना पंपिंग हाऊसपर्यंत लाईन पूर्ण होणे आवश्यक आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी तातडीने पूर्ण करण्यात यावे यासाठी न.प. प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. त्यासाठी शहराध्यक्ष बिपीन बंदरकर, माजी ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, सुदेश मयेकर, विकास पाटील, विजय खेडेकर, अभिजित दुडये आदींनी शीळ धरण येथे भेट दिली. www.konkantoday.com