
महामार्ग वृक्ष लागवडीसाठी आत्मक्लेष आंदोलन करण्याचा जलदूत शाहनवाज शाह यांचा इशारा
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणानंतर देशी वृक्ष लागवडीसंदर्भात महामार्ग विभाग तसेच कंत्राटदार कंपनीकडून होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनी येथील प्रांत कार्यालयासमोर आत्मक्लेष उपोषण करण्याचा इशारा येथील पर्यावरणप्रेमी, जलदूत शाहनवाज शाह यांनी महामार्ग कार्यकारी अभियंता यांना दिला आहे.याबाबत दिलेल्या निवेदनात शाहनवाज शाह यांनी म्हटले आहे की, मुळात कोकण प्रभागात शासकीय वनक्षेत्र अत्यल्प आहे. असलेल्या खाजगी जंगलातून परवाना व विनापरवाना मोठ्या प्रमाणात वृक्षतोड चालूच आहे. या सोबत रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातून जाणारा मुंबई- गोवा रस्ता व गुहागर-विजापूर रस्त्याचे रूंदीकरण करताना फार मोठ्या प्रमाणात एक तर सिमेंटचे रस्ते बांधले जात आहेत. त्यातच भूजल पातळी वाढवणार्या, तापमान कमी करणार्या, मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देणार्या स्थानिक प्रजातींच्या जुन्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली आहे. याचा विपरित परिणाम अखंड कोकणात होत आहे व वृक्ष लागवडीकरिता आपला विभाग निद्रिस्त आहे. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातून जाणार्या महामार्गावर ठेकेदारांनी अत्यंत अत्यल्प प्रमाणात साधारण १० टक्के ती सुद्धा परदेशी वृक्ष लागवड केलेली दिसून येत आहे.www.konkantoday.com