जिल्हा, ग्रामीण रुग्णालये ‘व्हेंटीलेटर’वर तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची सर्व पदे रिक्त

रत्नागिरी … तळकोकणातील प्रगतशील असलेला व शिक्षणाचे हब होणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णतः व्हेंटीलेटरवर गेली आहे. जिल्हा रूग्णालयासह ११ उपजिल्हा, ग्रामीण, रूग्णालयातील प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांची जवळजवळ सर्वच पदे रिक्त आहेत. जिल्हा शासकीय रूग्णालयात एकही तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाही. त्यामुळे शासकीय रुग्णालयात गेल्यावर उपचार कसे होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी येथील सत्ताधारी निवडणुकीमध्ये रममाण झाले आहेत. परंतु जनतेच्या आवश्यक आरोग्य सुविधेकडे लक्ष द्यायला मंत्री, आमदार, खासदार यांना वेळ नसल्यामुळे उपचाराअभावीच रूग्णांचे जीव जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनता शासकीय रुग्णालयातील उपचारांवर अवलंबून असते. खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घेणे त्यांना शक्य नसल्याने शासकीय रूग्णालय हाच एकमेव आधार त्यांच्यासाठी असतो. परंतु जिल्हा शासकीय रुग्णालयासह ११ उपजिल्हा, ग्रामीण रूग्णालयात ३० पैकी केवळ पाच वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरलेली आहेत. उर्वरित २५ पदे रिक्त राहिली आहेत.जिल्हा शासकीय रुग्णालयात वर्ग-१ची एकूण १९ पदे मंजूर आहेत, त्यापैकी जिल्हा शल्यचिकित्सक, निवासी वैद्यकीय अधिकारी, प्रशिक्षण केंद्र वैद्यकीय अधिकारी, शस्त्रक्रिया वैद्यकीय अधिकारी ही चारच पदे भरलेली असून उर्वरित विषय तज्ञांची सर्व पदे रिक्त आहेत. त्यामध्ये प्राधान्याने स्त्री रोग, प्रसुतीतज्ञ, बालरोगतज्ञ, अस्थिव्यंग चिकित्सक, बधीरकरण शास्त्रज्ञ, क्ष-किरण तज्ञ, मनोविकृती चिकित्सक, नेत्रशल्य चिकित्सक अशा १५ रिक्त पदांचा समावेश आहे.जिल्ह्यातील ११ उपजिल्हा, ग्रामीण रूग्णालयात प्रत्येकी एक एमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत, त्यापैकी राजापूर वगळता मंडणगड, गुहागर, देवरूख, संगमेश्वर, लांजा, रायपाटण, पाली, कळंबणी, दापोली, कामथे येथील एमएसची पदे रिक्त आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button