
सिंधुरत्न समृद्धी योजनेसाठी मंत्री योगेश कदम यांचा पुढाकार-मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले निवेदन.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास साधणारी रत्नसिंधु समृद्धी योजना सन २०२२-२३ पासून तीन वर्षांसाठी राबवण्यात आली होती. या योजनेंतर्गत कृषी, मत्स्य व्यवसाय, पर्यटन, सूक्ष्म उद्योग, जलसंधारण, वनसंपदा व औषधी वनस्पती या क्षेत्रात महत्वपूर्ण प्रगती झाली. दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी या योजनेचा कालावधी संपुष्टात आला असून तिच्या पुढील टप्प्याची गरज लक्षात घेता गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना योजनेच्या पुनरूज्जीवनाची मागणी करणारे निवेदन दिले आहे.
या योजनेमुळे कोकणातील नैसर्गिक संपत्तीचा शाश्वत वापर साधता आला. स्थानिक उद्योगांना चालना मिळाली. महिलांचे बचतगट, अनुसूचित जाती-जमाती व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सक्षम बनवण्यात मदत झाली. याच पार्श्वभूमीवर सिंधुरत्न समृद्धी योजना सन २०२५-२६ ते २०२७-२८ या पुढील तीन वर्षासाठी पुन्हा सुरू करण्याची मागणी मंत्री योगेश कदम यांनी केली आहे. तसेच या कालावधीत वार्षिक ५०० कोटी इतका निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंतीही त्यांनी पत्रात केली आहे.www.konkantoday.com