
रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीची पालखी बारा वाड्यांमध्ये रथामधून ग्रामप्रदक्षिणा करणार
कोरोना प्रादुर्भावामुळे यंदा शिमगा उत्सवामध्ये रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीची पालखी बारा वाड्यांमध्ये ज्या मार्गाने जाते त्याच मार्गावरून जाणार आहे मात्र या वेळी रथामधून ग्रामप्रदक्षिणा करेल आणि ज्या ठिकाणी रथ जाऊ शकणार नाही तेथे पालखी खांद्यावरून नेली जाईल अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष रवींद्र ऊर्फ मुन्ना सुर्वे यांनी दिली. तर यंदा ग्रामप्रदक्षिणा आणि सहाणेवर पालखी कोठेही खेळवण्याचा कार्यक्रम होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आज परिषदेत ही माहिती देण्यात आली शासनाचे नियम पाळून यंदा भैरी देवस्थानचा शिमगोत्सव शांततेत व सुरळीत पणे साजरा करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या १२ वाड्याच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत भैरी मंदिर उघडे राहणार आहे. नंतर कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.भैरीच्या पालखीच्या नगर प्रदर्शनाच्या वेळी उलपे स्वीकारले जाणार नाहीत. पौर्णिमा ते धुलीवंदन या कालावधीत सहाणेवर ओटी भरता येईल. सहाणेवर पालखी बसल्या नंतर ठराविक अंतर ठेवून उलपे घेण्यात येणार आहेत. तसेच होळी ही यंदा उंचीने लहान असून, काही ठराविक लोकांच्या उपस्थितीत झाडगावं येथील सहाणेवर उभी केली जाणार आहे.
www.konkantoday.com