
बारसू परिसरातील एमआयडीसी प्रकल्पासाठी अर्जुना व पांगरे चिंचवाडी धरणातून पाणीपुरवठा करण्यास शासनाने मान्यता
राजापूर तालुक्यातील बारसू, सोलगांव परिसरात एमआयडीसी प्रकल्प होणार की रिफायनरी प्रकल्प होणार याबाबत संभ्रमावस्था व सध्या या परिसरात वातावरण रिफायनरीवरून ढवळून निघाले आहे, असे असताना आता बारसू परिसरातील एमआयडीसी प्रकल्पासाठी अर्जुना व पांगरे चिंचवाडी धरणातून पाणीपुरवठा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.राजापूर तालुक्यातील बारसू, सोलगांव, गोवळ वरचीवाडी, गोवळ खालचीवाडी परिसरातील सुमारे ९३६ हेक्टर जमिनीवर औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी जानेवारी २०२० मध्ये अधिसूचना काढण्यात आली होती. कोकणातील शेतकर्यांचे जीवनमान उंचावेल, स्थानिक उत्पादनांना उद्योगांच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळेल तसेच तरूणांना रोजगार उपलब्ध होईल, यासाठी स्थानिक ग्रामपंचायतींनी या एमआयडीसी प्रकल्पाला संमती दिली होती. दरम्यानच्या काळात स्थानिकांच्या विरोधामुळे रद्द झालेला नाणार परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प बारसू सोलगाव परिसरात हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या. www.konkantoday.com