
रत्नागिरी शहरातील रस्ते चकाचक झाल्यानंतर नळ जोडण्यांसाठी खोदकाम
रत्नागिरी : शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण होऊन रुपडे पालटले जात असतानाच आता विद्रुपीकरण सुद्धा होऊ लागले आहे. नळ जोडणी देण्यासाठी आणि इतर बिघाड दुरुस्त करण्यासाठी रस्ते खोदून ही दुरुस्ती करावी लागत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी खोदाई केली जात आहे तेथील रस्ता विद्रूप दिसत आहेत.
रत्नागिरी शहराच्या नळपाणी योजनेंअंतर्गत जलवाहिन्या अंथरल्या गेल्या आहेत. जुन्या जलवाहिन्या रस्त्यांच्या कडेला टाकण्यात आल्या होत्या. त्या जुन्या जलवाहिन्या काढून तेथे नवीन जलवाहिन्या टाकायच्या झाल्या तर शहराच्या पाणीपुरवठ्यात सलग अनेक दिवस व्यत्यय आला असता. त्यामुळे नवीन नळपाणी योजनेच्या आराखड्यानुसार अनेक ठिकाणी रस्त्यांच्या मधोमध नवीन अंतर्गत जलवाहिन्या अंथरण्यात आल्या आहेत. या अंतर्गत जलवाहिन्या टाकण्यासाठी रस्ते खोदाई झाल्याने फारच ओरड सुरू झाली होती. या जलवाहिन्या टाकल्यानंतर रस्त्यांचे डांबरीकरण सुरू झाले. आता हे काम पूर्णत्वाच्या दिशेने असतानाच अनेक ठिकाणी रस्त्यांच्या मधोमध खोदाई केली जात आहे. या ठिकाणी असलेल्या अतंर्गत जलवाहिनीवरून नवीन नळजोडणी द्यावी लागत आहे. शनिवारी एका दिवसांत बाजारपेठ, अभ्युदयनगर, मारुती मंदिर परिसरात अशी खोदाई करून काम करण्यात आले आहे. त्यामुळे हे रस्ते विद्रूप झाले आहेत.