
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची कामे अनेक ठिकाणी अर्धवट,महामार्ग बनलाय मृत्यूचा सापळा.
बीबीमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची कामे अनेक ठिकाणी अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. महामार्गावर येणार्या पाच जिल्ह्यांत गेल्या काही महिन्यांत अपघात आणि अपघातातील बळींची संख्या वाढत आहे.एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात जानेवारी 2024 ते फेब्रुवारी 2025 अखेर 127 अपघातांमध्ये 137 जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामध्ये 115 पुरुषांसह 22 महिलांचा समावेश आहे. त्यातील सर्वाधिक अपघात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर झाले आहेत, ही बाब चिंता वाढविणारी ठरत आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील रस्ते वळणावळणाचे आहेत.
अवघड वळणांवर होणारे अपघात टाळण्यासाठी सुमारे 20 वर्षांपूर्वी मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले. परंतु रत्नागिरी जिल्ह्यातील रस्त्याचे काम अद्यापही अपूर्णच आहे. त्याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. जानेवारी 2024 ते फेब्रुवारी 2025 या 14 महिन्यांच्या कालावधीत 127 गंभीर अपघात जिल्ह्यात झाले असून, त्यातील सर्वाधिक अपघात मुंबई-गोवा महामार्गावर झाले आहेत.
या सर्व अपघातांमध्ये 137 जणांचा नाहक बळी गेला आहे. याच कालावधीत 119 छोटे अपघात झाले असून, त्यामध्ये 292 जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये 210 पुरुषांसह 82 महिलांचा समावेश आहे. किरकोळ 89 अपघातांमध्ये 264 जणांना दुखापत झाली आहे. त्यामध्ये 187 पुरूष तर 77 महिलांचा समावेश आहे. 64 अपघातांमध्ये केवळ वाहनांचे नुकसान झाले असून, चालक जखमी झालेले नाहीत. चौपदरीकरणाचे काम संगमेश्वर ते हातखंबापर्यंत अर्धवट अवस्थेत आहे. या भागात अपघातांची संख्या मोठी आहे.