दिवा रत्नागिरीला दादरवरून सुरू न झाल्यास गोरखपूर रेल्वेगाडी रोखू , प्रवाशांचा इशारा!

मुंबई : गेल्या तीन वर्षांपासून दादर-रत्नागिरी-दादर रेल्वेगाडी दिव्यावरून सोडण्यात येत असून कोकणवासीयांकडून वारंवार मागणी करूनही रेल्वेगाडी दादरवरून चालवण्यास चालढकल केली जात होती. आता तर १ जानेवारीपासून दादर-रत्नागिरी रेल्वेगाडीच्या वेळेत गोरखपूर रेल्वेगाडी सुरू करण्यात आली आहे. दिवा-रत्नागिरी रेल्वेगाडी दादरवरून सुरू न झाल्यास गोरखपूर रेल्वेगाडी रोखली जाईल, अशी भूमिका कोकणवासियांनी घेतली आहे.

नुकताच कोकण रेल्वेवरील पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी खासदार अरविंद सावंत आणि प्रवासी संघटना उपस्थित होते. यावेळी दादर रत्नागिरी गाडी सुरू करण्यात यावी, कोकण रेल्वेची स्थानके अद्ययावत करण्यात यावीत, कोकण रेल्वे स्थानकांच्या परिसराचे सुशोभिकरण करण्यात यावे, स्थानकांवरील सुविधा, स्वच्छतागृहे यात सुधारण करण्यात यावी, कणकवली रेल्वे स्थानकावर चढण्यासाठी सरकते जिने तयार करण्यात यावेत, मत्स्यगंधा एक्स्प्रेस आणि तेजस एक्स्प्रेस यांना कणकवली रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या.पश्चिम उपनगरातील अनेक रहिवासी गणपती, होळी, दिवाळी, गुढीपाडवा आणि उन्हाळ्यात सुट्ट्यांसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे जात असतात.

पश्चिम उपनगरात सुमारे सात ते आठ लाख कोकणी कुटुंबे राहतात. त्यामुळे याभागातून वांद्रे टर्मिनस ते सावंतवाडी ट्रेन सुरू करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. राज्यातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढत असल्याने, या मार्गावरून वसई ते सावंतवाडी, पनवेल ते रत्नागिरी (सकाळी), दिवा ते सावंतवाडी, दादर ते सावंतवाडी अशा रेल्वेगाड्या सोडण्यात याव्यात.कोकण रेल्वेसाठी भूसंपादन करताना ज्यांनी जमीन गमावली ते दीर्घकाळ प्रतीक्षेत असून या प्रकल्पग्रस्तांना नोकरभरतीद्वारे सामावून घेणे, तसेच ज्या प्रकल्पग्रस्तांची गट ‘सी’ पदासाठी आवश्यक पात्रता नसेल. त्यांना भरपाई देण्यात यावी, तसेच शक्य असल्यास त्यांना कोकण रेल्वे स्थानकांच्या आवारात, स्थानकांवर स्टाॅल देण्यात यावे, जेणेकरून त्यांना कुटुंबासाठी निर्वाहासाठी कमाईचे साधन मिळू शकेल.

रायगड जिल्ह्यातील रोहा ते पनवेल परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी जमिनी दिल्या आहेत. त्यांच्यासाठी रोहा लोकल दर तासाला पनवेलला जाण्यासाठी सुरू करावी, जेणेकरून शेतकरी पनवेलला येऊन पुढे मुंबईला त्यांच्या कामासाठी येऊ शकतील. सध्या त्यांना अन्य प्रवासी मार्गावर अवलंबून रहावे लागत असल्यामुळे समस्यांना तोंड द्यावे लागते. गेल्या तीन वर्षांपासून दादर-रत्नागिरी रेल्वेगाडी बंद करून, दिवा-रत्नागिरी रेल्वेगाडी चालवण्यात येत आहे. आता दादर-गोरखपूर सुरू करून, मुंबईतील कोकणवासियांची गैरसोय करून इतर प्रवाशांना सेवा पुरवली जात आहे. लवकरच मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन, दादर-रत्नागिरी रेल्वेगाडी सुरू केली जाईल. रेल्वेगाडी सुरू न झाल्यास दादर-गोरखपूर रेल्वेगाडी रोखली जाईल. *- अरविंद सावंत, खासदार*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button