
माकडे पळवण्यासाठी लावलेले पिंजरे रिकामे, बाहेर मिळणाऱ्या मुबलक खाण्यामुळे माकडानी फिरवली पाठ
रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे वानर व माकडे पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरे पाठवलेले आहेत.सोमवारपासून पिंजरे लागले खरे; पण सध्या आंबे, काजू, फणस इतर फळे खायला मुबलक असल्यामुळे वानर-माकडं जमिनीवरील खाण्याकडे किती लक्ष देतील, हा प्रश्नच आहे. त्याचा प्रत्यय घटनास्थळी आला. येत्या काही दिवसात ही मोहीम यशस्वी होण्याची शक्यता असून, या मोहिमेला गती मिळाल्यानंतर प्रत्येक गावांमध्ये त्याच पद्धतीने वानर-माकडे पकडण्यासाठी पिंजरे दाखल होणार, असे वनविभागातर्फे सांगण्यात आले. सुमारे दीड ते पावणेदोन वर्षे शेतकरी, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने वानर-माकड यांचा कायमचा बंदोबस्त व्हावा यासाठी उपोषणं, सभा, पत्रव्यवहार, पदयात्रा असे अनेक प्रयत्न करण्यात आले होते. त्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी तात्पुरता उपाय म्हणून जिल्हा नियोजन समितीमधून बोलेरो गाडी आणि पिंजऱ्यासाठी निधी दिला. या निधीतून वनविभागाने दोन गाड्या आणि पिंजरे बनवून घेतले. रविवारी (ता. २८) एक गाडी व पिंजरा घेऊन वनविभागाचे कर्मचारी गावडे, साबणे आणि त्यांचे सहकारी वानर-माकड पकडण्यासाठी गोळपमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी गोळप येथे माकड पकडण्यासाठी सकाळी पिंजरे लावले होते. काही माकडे पिंजऱ्याजवळ आली होती; मात्र ती पिंजऱ्यात अडकलेली नाहीत.वानर-माकड यांना पिंजऱ्यात अडकवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.www.konkantoday.com