
*छत्रपती संभाजीनगर किंवा दाभोळमध्ये येणारा मोठा प्रकल्प आता मध्य प्रदेशात
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी एका इंग्रजी दैनिकातील वृत्ताचा हवाला देत छत्रपती संभाजीनगर किंवा दाभोळमध्ये येणारा मोठा प्रकल्प आता मध्य प्रदेशात गेल्याचा दावा केला आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट करत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांना हा उद्योग मध्य प्रदेशात कसा गेला? याचे उत्तर द्या, असे आवाहन केले आहे.महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर किंवा दाभोळ येथे गेल इंडिया नावाची कंपनी ५० हजार कोटींची गुंतवणूक करून इथेन क्रॅकिंग युनिट उभारणार होते. आता हा प्रकल्प महाराष्ट्रात न येता मध्य प्रदेशच्या सिहोर येथे उभारला जाणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राचा विचार करत असताना मध्य प्रदेशात कसा गेला? महाराष्ट्राचा वाट्याला येणारा रोजगार असा सहज बाहेर कसा गेला? याचे उत्तर द्या उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, असे दानवे यांनी म्हटले आहे.आंधळ्या समर्थकांसाठी खाली लिंक, स्क्रीनशॉट देतो आहे. पूर्ण वाचूनच व्यक्त व्हा, असा टोलाही दानवे यांनी लगावला. शिवाय याला अनुसरून महाराष्ट्राला या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. प्रकल्पाने जागेसाठी विचारणा केली होती का? विचार केला होता तर त्यांनी महाराष्ट्र का नाकारला? सरकारी कंपनी असल्याने मध्य प्रदेशात हा प्रकल्प नेण्यासाठी केंद्राने दबाव टाकला का? याची उत्तरे सरकारने द्यावी, एवढी अपेक्षा आहे, असेही दानवे यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.www.konkantoday.com




