स्वच्छ व पुरेसे पाणी द्या !रस्ता , पाणी व अन्य सोइसुविधांसाठी राजापूर वासियांची राजापूर नगर परिषदेवर धडक धोपेश्वरघाटी परिसरातील नागरिकांची न.प. वर धडक

राजापूर / : राजापूर शहरातील धोपेश्वरघाटी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी, रस्ता व अन्य समस्यांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी राजापूर नगर परिषदेवर धडक देत नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारला. येथील नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठा देखील सुरळीत होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. तसेच नव्याने झालेल्या जवाहर चौक ते रानतळे रस्त्याच्या कामात त्रुटी असून गटाराचे काम निकृष्ट असल्याची तक्रारही यावेळी उपस्थित नागरिकांनी केली.

धोपेश्वरघाटी परिसरातील नागरिकांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन नगर परिषद प्रशासनाला दिले असून त्यामध्ये या भागातील नागरिकांना ज्या साठवण टाकीतून पाणीपुरवठा होतो ती टाकी जीर्ण झाली असून टाकीवरील स्लॅबचा काही भाग हा मोडून टाकीमध्ये पडलेला आहे. तसेच टाकीची मागील बरेच वर्षे साफसफाई झालेली नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात चिखल साठलेला आहे. तेच पाणी आम्हा नागरिकांना पुरविले जात आहे. त्यामुळे गढूळ पाणी येत असून छोटे मासे देखील येतात. असे गढूळ व अस्वच्छ पाणी सेवन केल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

नुकत्याच करण्यात आलेल्या जवाहर चौक ते रानतळे रस्त्याच्या डांबरीकरण कामात रस्त्यावर काढण्यात आलेल्या गटारांवर बसवण्यात आलेल्या जाळ्या हलक्या प्रतीच्या असून त्या कधीही वाकू अथवा तुटू शकतात. या मार्गावरून बुरंबेवाडीकडे जाणाऱ्या एसटी बसेसची सतत वर्दळ असते शिवाय इतर अवजड वाहनेही जात-येत असतात. हलक्या प्रतीच्या बसवण्यात आलेल्या जाळीमुळे अपघाताची दाट शक्यता आहे. गटाराचे काम देखील निकृष्ठ दर्जाचे त्यातून पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची शंका निर्माण झालेली आहे असेही नागरिकांनी या निवेदनात नमूद केले आहे.

राजापूर ते रानतळे या रस्त्यावरून श्रीदेव धूतपापेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिशादर्शक फलक होता. परंतु, अलिकडे जवळपास तीन ते चार वर्ष असा कोणताही मार्गदर्शक फलक लावलेला नाही. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना व भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. त्याठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत अशी मागणीही या नागरिकांनी केली. यावेळी माजी नगरसेवक नरेंद्र कोंबेकर, सौरभ खडपे यांच्यासह सुरेंद्र तांबे, सतीश तांबे, सहदेव पारकर, मजिद पाटणकर, ॲड. राहूल तांबे, विजय हिवाळकर, शितल रहाटे, दिवाकर बोटले, मंदार बावधनकर, निलेश रहाटे आदींसह नागरीक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button