
आम्हाला पुन्हा एकदा मातोश्रीवर येवून उद्धव साहेबांची माफी मागायची आहे- शिंदे गटांमधील अनेकांचे निरोप खासदार विनायक राऊत यांचा गौप्यस्फोट
आम्ही चुकलोय, आम्हाला पश्चाताप होतोय, त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा मातोश्रीवर येवून उद्धव साहेबांची माफी मागायची आहे. अशा पद्धतीचे निरोप शिंदे गटातील अनेकाचे येत असल्याचा गौप्यस्फोट रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांनी केला. आगामी निवडणुकीच्या आधी शिंदे गटात मोठा भूकंप होईल असं भाकीत खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना केले.
खासदार विनायक राऊत सोमवारी रत्नागिरी दौर्यावर आले होते. यावेळी ते म्हणाले की, ज्या १३ खासदारांनी बेईमानी केली, गद्दारी केलेली आहे. त्यांच्यापैकी जास्तीत जास्त ३ जणांना पुन्हा एकदा निवडणूक लढवायला संधी मिळेल, अशी आमची माहिती आहे. बाकीच्या १० जणांचं विसर्जन १०० टक्के होणार आहे. त्यांच्यापैकी बर्याच जणांचे निरोप प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष येत आहेत. पण ते कोणाकोणाचे आहेत ते मी आता सांगणार नसल्याचे राऊत यांनी सांगितले. परंतु मींधे गटामध्ये जबरदस्त भूकंप होणार आहे, असे खासदार विनायक राऊत यावेळी म्हणाले.
लोकसभेच्या निवडणुका पुढील वर्षी एप्रिलमध्ये होणार आहेत. साधारणतः फेब्रुवारीला आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याच्या अगोदरच हा भूकंप होईल, असं भाकीत खासदार विनायक राऊत यांनी यावेळी वर्तवलं आहे. www.konkantoday.com