
सेवानियुक्तीची मुदत संपल्याने जि.प. शाळांतील तात्पुरते ६८४ शिक्षक थांबणार
आंतरजिल्हा बदली व नियमित सेवानिवृत्त शिक्षकांमुळे जिल्ह्यात वाढलेली जि.प. प्राथमिक शाळांवरील शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या पाहता सध्या २००० पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. त्यावर पर्यायी व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात ६८४ शिक्षक शाळांवर नेमण्यात आले होते. या शिक्षकांची सेवानियुक्तीची मुदत ३० एप्रिलला संपणार आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांवरील शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे गेल्या काही वर्षापासून शिक्षण विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. शैक्षणिक दर्जात जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. पण येथील शाळांवरील रिक्त शिक्षकांच्या पदांच्या संख्येमुळे शैक्षणिक ओढाताण सुरू आहे. जिल्ह्यात सध्या २००० पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. त्यातच येथील आंतरजिल्हा बदली व नियमित सेवानिवृत्त शिक्षकांमुळे रिक्त पदांची संख्या वाढत आहे.शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा विषय रिक्त पदांमुळे वादग्रस्त ठरला आहे. गेल्या ४ वर्षात दीड हजारपेक्षा जास्त शिक्षक हे आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्याबाहेर गेले आहेत. यामुळे मंजूर पदांच्या तुलनेत ३० टक्केपेक्षा अधिक पदे रिक्त झाली. त्या समस्येवर मागील काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून जिल्हा परिषद प्रशासनाच्या कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. प्रशासनाला या प्रश्नी धारेवर धरले होते. त्यानंतर शाळांवर तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक नेमण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यासाठी पालकमंत्री सामंत यांनीही मध्यस्थी केली होती. त्यामुळे मानधन तत्वावर डीएड व बीडएडधारकांना तात्पुरती स्वरूपात नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. www.konkantoday.com