
कशेडी घाटातील बोगद्याचे काम युद्धपातळीवर सुरू
कशेडी घाटातील बोगद्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मे महिन्याअखेर हे काम पूर्ण होऊन दुहेरी वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे; मात्र मे महिन्यात सुट्ट्यांसाठी आणि निवडणुकीच्या काळात येणाऱ्या लोकांना मात्र प्रवासातील त्रास सहन करावा लागणार आहे.मुंबईमधून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना प्रवासादरम्यान मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबईमधून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कशेडी घाटातील वळणावळणाच्या रस्त्याने यावे लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत बोगद्याचे काम सुरू करण्यात आले. कशेडी घाटातील हे बोगद्याचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. कोकणवासियांना कशेडी घाट अवघ्या ५ ते ७ मिनिटांत पार करता येणार आहे. या बोगद्यामुळे एका तासाचा प्रवास फक्त दहा मिनिटात पूर्ण करता येणार आहे. कशेडी घाट हा रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडतो. या घाटातील प्रवास हा धोकादायक समजला जातो. याला पर्याय म्हणून कशेडी घाटात बोगदा तयार केला जात आहे. या बोगद्यासाठी ४४१ कोटी रुपयांची तरतूद करून केली असून, याचे काम २०१८ मध्ये सुरू झाले आहे. कशेडी घाटात दोन बोगदे होत आहेत. यातील प्रत्येक बोगद्यात तीन मार्ग आहेत. यातील एकेरी मार्ग हा वाहतुकीसाठी खुला केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कशेडी ते रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर येथील भोगाव इथपर्यंत हा मार्ग आहे. www.konkantoday.com